प्रतिनिधी / कोल्हापूर
शहरातील रस्त्याकडेला, महापालिकेच्या आरक्षित जागेत टपऱ्या, केबिन्स आणि टॅम्पो उभारून विनापरवाना विविध व्यवसाय करण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे सर्व कर भरून व्यवसाय, व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांवर अन्याय होत आहे. या कडे लक्ष वेधत स्थायी समितीच्या सभेत काँग्रेसचे गटनेते शारंगधर देशमुख यांनी अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. केवळ एक दिवसाच्या कारवाईचे नाटक कधी बंद होणार ? असा, सवालही त्यांनी केला.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्थायी समिती सभा ही सभा व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे झाली. स्थायी समिती सभापती सचिन पाटील यांनी छत्रपती ताराराणी सभागृहातून सदस्यांशी ऑनलाईन संवाद साधला. अतिक्रमण, डांबरी प्लँट, ब्लड बँक आदी विषयावर चर्चा झाली. शारंगधर देशमुख म्हणाले, शहरातील रस्त्यांच्याकडे टॅम्पो उभारून विविध वस्तू, खाद्य पदार्थांची विक्री केली जात आहे. टॅम्पोतील हॉटेल वाढत आहेत. महापालिकेच्या आरक्षित जागेत विनापरवाना केबिन्स उभारून विनापरवाना व्यवसाय सुरू आहेत. हे व्यावसायिक शासन आणि महापालिकेचा कोणताही कर भरत नाहीत. सर्व कर भरून दुकानगाळ्यात व्यवसाय करणाऱ्या व्यापारी, व्यावसायिकांपेक्षा रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणारे जादा पैसा मिळवत आहेत. त्यामुळे कर भरणाऱ्यांवर हा अन्याय होत आहे. सदस्यांनी आवाज उठविल्यानंतर अतिक्रमण निर्मूलन विभाग एक दिवस कारवाईचे नाटक करतो. हे थांबून आता कारवाई करा, अशी मागणी देशमुख आणि जय पटकारे यांनी केली.
कसबा बावडा येथील डांबरी प्लँट कचरा व लिचडमुळे सुरू होणार नसेल तर अन्यत्र हलविण्यात यावा. त्यावर प्रशासनाने डांबरी प्लँट पुईखडी येथे स्थालांतरीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. नवीन प्लँट उभारणीसाठी दीड कोटी खर्च अपेक्षित आहे. डांबरी रस्त्यांचे पॅचवर्कचे नियोजन सुरू आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली. पूजा नाईकनवरे यांनी उद्यान विभागाकडे आस्थापनेवर 300 कर्मचारी असतांना सध्या केवळ 146 कर्मचारी कार्यरत आहेत. या कर्मचाऱयांवर संपुर्ण शहरातील बागेची कामे कशी काय पुर्ण करणार ? असा प्रश्न उपस्थित केला. त्यावर कर्मचारी सेवत असताना मृत झाल्यास त्याच्या वारसास अनुकंपामध्ये नोकरी मिळते. दरवर्षी निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱयांपैकी 10 टक्के कर्मचाऱयांच्या वारसदारांना अनुकंपा तत्वावर घेतले जाते. त्यामुळे 10 ते 12 कर्मचारी दरवर्षी घेता येतात, असा खुलासा प्रशासनाने केला. प्रभागात कचरा गोळा करण्यासाठी व गटारीतील काढण्यात आलेली खरमाती व इतर कचरा उठाव करण्यासाठी वेगळी व्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी पूजा नाईकनवरे यांनी केली.