भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा यांनी बिहारच्या पाटणामध्ये राज्य कार्यकारणीच्या मेळाव्यात बोलताना देशातील कोणत्याही राष्ट्रीय पक्षात भाजपशी लढण्याचे सामर्थ्य राहिलेले नाही. महाराष्ट्रात शिवसेनेला घरघर लागली आहे, काँग्रेसने अनेक राज्यातून आपला गाशा गुंडाळलेला आहे. उर्वरित पक्षही संपतील आणि देशात केवळ भाजप राहील! असे वक्तव्य केले आहे. आपलाच पक्ष देशावर राज्य करत राहील आणि सगळय़ा राज्यातही आपल्याच पक्षाची सत्ता येईल असे स्वप्न बघण्यास अद्याप तरी कर आकारला जात नाही. तसे स्वप्न बघणे गैरही नाही. पण देशात एकही विरोधी पक्ष राहणार नाही हे म्हणणे जरा अतीच झाले. राष्ट्रीय अध्यक्ष नड्डा यांच्या कार्यकाळात अनेक राज्यांमध्ये भाजपची सत्ता येऊ लागली आहे. त्यामुळे कदाचित त्यांना असा भास होणे स्वाभाविक आहे. मात्र वास्तवात तसे चित्र निर्माण होण्याची शक्मयता फारच कमी आहे. लोकांनी नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास दाखवून त्यांना सलग दोनवेळा देशाची सत्ता सोपवली आहे. अशाप्रकारे काँग्रेसनेही प्रदीर्घकाळ देशावर राज्य केले होते. 1952 च्या निवडणुकीपासून आणीबाणी नंतर झालेल्या 77 च्या निवडणुकीपर्यंत देशात काँग्रेसचा बोलबाला असतानासुद्धा किंवा इंदिरा गांधी यांच्या हत्येपश्चात राजीव गांधी यांना देशात बहुमत मिळालेले असतानासुद्धा प्रादेशिक पक्ष आपले अस्तित्व राखून होते. काही ठिकाणी तर त्यांनी काँग्रेसला हद्दपार केले होते. या सगळय़ा इतिहासाचा नड्डा यांनी धांडोळा घेतला असता तर एकपक्षीय अश्वमेधाची भाषा त्यांनी केली नसती. अर्थात विजयाच्या घोडय़ावर स्वार झालेले असताना त्यांना आजूबाजूचा आवाज गौण वाटणे स्वाभाविक आहे. पण राजकारण हे वास्तवावर चालत असते स्वप्नरंजनावर नाही. शालेय वयात मुलांना शिकवल्या जाणाऱया नागरिकशास्त्राच्या पुस्तकातसुद्धा भारतीय लोकशाहीची जी वैशिष्टय़े विशद केलेली आहेत त्यामध्ये बहुपक्षीय राज्यपद्धती आणि सत्ताधारी, विरोधक या दोन्ही व्यवस्थांचे महत्त्व ठीकठिकाणी दिसून येते. ते केवळ पाठ्यपुस्तकात समाविष्ट करावे म्हणून करून ठेवलेले नाही. भारतातील सर्वसामान्य जनता ही प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून मतदान करते. म्हणूनच ती वाजपेयींना 13 दिवसांपासून पूर्ण काळाचे सरकारपण हीच जनता बनवून देते आणि पाठोपाठ सोनिया गांधी यांच्या नेतृत्वाखाली यूपीएला दहा वर्षांची सत्ताही सोपवते. या यूपीएच्या काळात झालेल्या चुकीच्या कारभाराचा विरोध म्हणून नरेंद्र मोदी यांची लाटही निर्माण करते आणि त्याच मोदींना पुढच्या पाच वर्षांचीही संधी देते. याचा अर्थ स्पष्ट आहे, निवडणुकांचे निकाल कितीही एकतर्फी वाटले तरीही त्यातून त्या काळातील मतदारांचा ठाम निर्धार व्यक्त होत असतो. ज्या घराणेशाहीला संपवण्याच्या गोष्टी जे पी नड्डा करत आहेत, त्या खरोखरच पूर्ण होत आहेत का? की त्यातीलच काही घराण्यांना सोबतीला घेऊन नड्डा यांचा पक्ष अनेक राज्यात वाढत आहे याचा विचार केल्यास घराणेशाही हा मुद्दा किती तकलादू आहे हे सहज लक्षात येईल. खुद्द भाजप नेत्यांची मुलेसुद्धा राजकारणात आलेली असताना त्यांनी घराणेशाहीवर टीका करणे जनतेला रुचणार का? हे भविष्यात त्यांचे नेतृत्व कोण करतात यावरून दिसून येईलच. पण, एका घराण्याचे वर्चस्व आहे म्हणून ते पक्ष संपतील, असे म्हणणारे नड्डा हे विसरतात की अशाच काही घराण्यांच्या खांद्यावर बसून त्यांचा पक्ष मोठा झाला आहे. आंध्र प्रदेशच्या एनटी रामाराव यांच्या काँग्रेसमुक्त देशाचे स्वप्न रामाराव यांच्या हयातीत पूर्ण होऊ शकले नाही. पण, देशात विरोध आणि विरोधक असला पाहिजे या भूमिकेतून रामाराव यांचा प्रादेशिक पक्ष लढत राहिला. त्यांचे उत्तराधिकारी चंद्राबाबू नायडू हे कधीकाळी भाजपचे मित्र होते. आता ते अस्तित्वासाठी लढत आहेत. त्याचवेळी त्यांना पराभूत करून पुढे आलेल्या जगन मोहन रेड्डी यांच्याशी भाजपची जवळीक वाढली आहे. ओडिशाचे नवीन पटनायक आणि रेड्डी हे दोन मुख्यमंत्री केंद्रीय भाजपच्या सत्तेशी जुळवून घेत राजकारण करत आहेत. पण नड्डा यांनी त्यांनाही सोडलेले नाही. हे सगळे पक्ष घराणेशाहीचे आहेत आणि ते लवकरच संपतील असे ते बोलून गेले आहेत. ते ज्या बिहारमध्ये बोलत होते, तेथे त्यांनी दोन दिवसांपूर्वी फेरी काढली आणि 2025 साली बिहार निवडणुकीत भाजप 200 जागा लढवेल असे एकतर्फी जाहीर केले. म्हणजे चार वर्षे आधीच बिहारचे जागा वाटप धोरण निश्चित करून नितीश कुमार यांच्या पक्षासह इतर सहकारी पक्षांना केवळ 43 जागा सोडण्याची एकतर्फी तयारी दर्शवली. भाजपच्या मदतीने सत्तेवर आलेल्या मुख्यमंत्री नितीश कुमार यांना एकार्थाने त्यांनी शरण येण्यासच सांगितले आहे. आज नितीश कुमार जरी मुख्यमंत्री असले तरी चार वर्षात त्यांच्या पक्षाची अधिक दयनीय अवस्था होईल असेच त्यांनी अप्रत्यक्ष सांगून टाकले आहे. पुढची चार वर्षे नितीश कुमार यांची किती किंमत राखली जाईल हे यातून सूचित होत आहे. एकूणच भाजप आपल्या मित्र पक्षांनाही सोडायला तयार नाही. संपूर्ण देशात एक छत्री अंमल असेल असे म्हणणे वेगळे आणि विरोधक शिल्लक राहणार नाही असे म्हणणे वेगळे. चीनमध्ये एकमेव कम्युनिस्ट पक्ष सत्तेवर आहे. एका अर्थाने त्या देशात हुकूमशाही सुरू आहे. अशा प्रकारची हुकुमशाही भारतात अपेक्षित आहे काय? आणि तशी हुकूमशाही अपेक्षित असेल तर ती या देशातील जनता मान्य करणार आहे काय? या वक्तव्याला विरोध होणार हे निश्चित आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव, समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांच्यासह विविध नेत्यांनी नड्डा यांच्या या भूमिकेला तीव्र शब्दात विरोध दर्शवला आहे. देशाची हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली आहे. पण केवळ बोलक्मया टीकेला काही अर्थ नाही. विरोधक राष्ट्रपती निवडणुकीमध्ये सुद्धा आपली एकी दाखवू शकले नाहीत. गेल्या अनेक महिन्यात संसदेत एक स्थगन प्रस्ताव विरोधकांकडून आलेला नाही, गोंधळ घालायचा आणि निलंबित झाल्याचा आनंद व्यक्त करत संसदेबाहेरच्या गांधींच्या पुतळय़ासमोर आंदोलन करायचे यात विरोधी पक्ष धन्यता मानत आहेत.
Previous Articleनिजात्मसुख आणि सन्मार्ग
Next Article डिजिटल व्यवहारामध्ये होणार वाढ : पेटीएम
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.