बेळगाव / प्रतिनिधी
विविधतेतून एकता निर्माण करणारा भारत देश सर्वांना आदर्श आणि प्रेरणा देणारा आहे. त्यामुळे कोणत्याही भाषेचा द्वेष न करता सन्मान व गौरव करायला प्रत्येकाने शिकले पाहिजे. भाषा ही सर्व संस्कृती, परंपरा, वैचारिकतेला चालना देणारी असून एकमेकांना जोडणारा दुवा आहे. ती मानवाच्या अंतरंगाचा ठाव घेते आणि सर्वत्र भाषा विकसित पावते, असे प्रतिपादन धारवाड येथील हिंदी प्रचार सभेचे प्रमुख प्राचार्य डॉ. संजय मादार यांनी केले. ते ‘समाजातील भाषांचे महत्त्व : एक चिंतन आणि तरुणांची जबाबदारी’ या विषयावर बोलत होते.
सदर कार्यक्रम धारवाड येथील कर्नाटक विश्वविद्यालयाच्या सभागृहात पार पडला. व्यासपीठावर प्रा. डॉ. सी. के. पवार, प्राचार्य डॉ. संजय मादार, प्रा. डॉ. नीता दौलतकर, प्रा. डॉ. प्रभा भट उपस्थित होत्या. यावेळी हिंदी विभागाच्या प्रा. डॉ. नीता दौलतकर यांची नुकताच दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. याबद्दल त्यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ, स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी प्रा. डॉ. मालतेश एस. बसम्मलवर, प्रा. डॉ. संतोष कृष्णापूर, प्रा. एन. एन. शिंदे, प्रा. डॉ. बी. वाय. तोंडीहाळ यासह प्राध्यापक, विद्यार्थी, कर्मचारी, पालक उपस्थित होते.