केरळमध्ये काँग्रेसची सत्तेत परतण्यासाठी धडपड
केरळ विधानसभा निवडणुकीच्या एकूण 140 जागांवर 957 उमेदवार उभे आहेत. मंगळवारी केरळच्या सर्व जागांसाठी मतदान होणार आहे. यंदा केरळच्या निवडणुकीच्या रणांगणात मुख्य लढत सत्तारुढ लेफ्ट डेमोक्रेटिक पंट (एलडीएफ) आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील युनायटेड डेमोक्रेटिक पंट (युडीएफ) दरम्यान असल्याचे मानले जात आहे. तर भाजपने या लढतीला त्रिकोणीय स्वरुप देण्यासाठी पूर्ण जोर लावला आहे. मुख्यमंत्री पिनाराई विजयन यंदा स्वतःची सत्ता कायम ठेवण्यासाठी धडपड करताना दिसून आले. तर काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल यांनी गांधी युडीएफला सत्तेवर आणण्यासाठी प्रचाराची धुरा हाती घेतली होती. अशा स्थितीत केरळच्या निवडणुकीत कोण बाजी मारतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
युडीएफ आघाडीत काँग्रेसने 93 जागांवर स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. तर सहकारी पक्ष युनियन मुस्लीम लीग 25 जागांवर निवडणूक लढवत आहे. याचबरोबर केरळ काँग्रेस (जोसेफ) 10, आरएसपी 5 तर उर्वरित 7 जागांवर अन्य सहकारी पक्षांचे उमेदवार उभे आहेत.
तर डाव्यांच्या एलडीएफमध्ये माकप 77, भाकप 24, केरळ काँग्रेस 12, जेडीएस 4, एनसीपी 3, इंडियन नॅशनल लीग 3, लोकतांत्रिक जनता दल 3 जागांवर निवडणूक लढवत आहे. उर्वरित 14 जागांवर अन्य सहकारी पक्षांनी स्वतःचे उमेदवार उभे केले आहेत. भाजपचे 113 उमेदवार रिंगणात असून त्याचा सहकारी पक्ष भारतीय धर्म जनसेना पक्षाने 21 उमेदवार उभे केले आहेत. याचबरोबर उर्वरित 6 जागा भाजपने अन्य पक्षांसाठी सोडल्या आहेत. तर 3 मतदारसंघांमधील भाजपच्या उमेदवारांचे अर्ज फेटाळले गेले आहेत.
हायप्रोफाइल लढती
केरळच्या विधानसभा निवडणुकीत दिग्गज नेते उतरल्याने अनेक मतदारसंघांमधील लढती रंजक ठरल्या आहेत. कोट्टयम जिल्हय़ातील पुथुपल्ली मतदारसंघात ‘डेव्हिड विरुद्ध गोलिएथ’ची लढाई आहे. येथे दोनवेळा मुख्यमंत्री राहिलेले 77 वर्षीय ओमन चंडी काँग्रेसचे उमेदवार आहेत. तर माकपचे 30 वर्षीय उमेदवार जॅक सी. थॉमस त्यांना आव्हान देत आहेत. धर्मादम उत्तर केळमधील सर्वात महत्त्वाच्या मतदारसंघांपैकी एक आहे. या मतदारसंघात मुख्यमंत्री पिनाराई विजयन उमेदवार आहेत. तर भाजपने येथे माजी प्रदेशाध्यक्ष सी.के. पद्मनाभन यांना तर काँग्रेसने सी. रघुनाथ यांना उमेदवारी दिली आहे.
पलक्कड मतदारसंघात बिगरमल्याळी मतदारांची संख्या निर्णाय आहे. येथे भाजपने मेट्रोमॅन ई. श्रीधरन यांना उतरविले आहे. तर काँग्रेसच्या वतीने शफी परमबिल मैदानात आहेत. नेमोम विधानसभा मतदारसंघात मागील वेळी भाजपने विजय मिळविला होता. भाजपने येथील स्वतःचे वर्चस्व कायम ठेवण्यासाठी के. राजशेखरन यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसने माजी मुख्यमंत्री के. करुणाकरन यांचे पुत्र आणि खासदार के. मुरलीधरन यांना मैदानात उतरविले आहे.
पाला मतदारसंघात युडीएफकडून एम.सी. कप्पन मैदानात आहे. तर एलडीएफकडून केरळ काँग्रेसचे अध्यक्ष जोस के. मणि उमेदवार आहेत. कोन्नी विधानसभा मतदारसंघ शबरीमला मंदिर आंदोलनाच्या प्रमुख केंद्रांपैकी एक आहे. या पर्वतीय क्षेत्रात भाजपला विजयाची अपेक्षा आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष के. सुरेंद्रन आणि एलडीएफचे के.यू. जेनिश तसेच युडीएफचे उमेदवार रॉबिन पीटर यांच्यात त्रिकोणी लढत होत आहे.
इरिनजलकुडा मतदारसंघात भाजपने राज्याचे माजी पोलीस महासंचालक जॅकब थॉमस यांना संधी दिली आहे. त्यांच्यासमोर केरळ काँग्रेस (जे)च्या थॉमस उन्निनयडन यांचे आव्हान आहे. कझाकुट्टम मतदारसंघात भाजपच्या वतीने शोभा सुरेंद्रन, काँग्रेसकडून एस.एस. लाल तर एलडीएफने कडकमपल्ली सुरेंद्रम हे मैदानात आहेत.
राहुल यांच्यासाठी विजय महत्त्वाचा
काँग्रेस नेत्यांमधील गटबाजी पाहून राहुल गांधी यांनी प्रचाराची धुरा स्वतःच्या हातात घेतली होती. याचमुळे राहुल यांनी 5 राज्यांच्या निवडणुकीत सर्वाधिक प्रचार केरळमध्ये केला आहे. अमेठीतून पराभूत झाल्यावर राहुल हे वायनाडचे खासदार आहेत. केरळमध्ये सत्तांतर घडवून आणणे राहुल यांना स्वतःचे राजकीय अस्तित्व कायम राखण्यासाठीही महत्त्वाचे ठरले आहे. काँग्रेसच्या विजयामुळे त्यांच्या राजकीय क्षमतेवर प्रश्न उपस्थित करणाऱया टीकाकारांना उत्तर मिळू शकते. तर दुसरीकडे पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर काँग्रेसचा नवा अध्यक्ष म्हणून त्यांची दावेदारी मजबूत होऊ शकते.
डावे इतिहास घडविणार?
डाव्या आघाडीसमोर केरळच्या राजकारणात 4 दशकांची परंपरा तोडण्याचे आव्हान आहे. डावे पक्ष पुन्हा एकदा सत्तेवर परतण्याची अपेक्षा व्यक्त करत आहेत. सत्ताविरोधी भावनेचा प्रभाव कमी करण्यासाठी एलडीएफने स्वतःच्या 36 आमदारांना तिकीट नाकारले होते. त्यांच्या जागी तरुण-तरुणी आणि महिला कार्यकर्त्यांवर विश्वास दाखविण्यात आला आहे. केरळमधील बालेकिल्ला राखण्यास अपयश आल्यास देशभरात डाव्यांची कुठेच सत्ता राहणार नाही.