भाजपच्या विरोधात देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र आले पाहिजे असा संदेश देत पाच दिवस दिल्लीत ठाण मांडून बसलेल्या ममता बॅनर्जी यांना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यापासून विविध नेत्यांनी भेट देऊन एकत्र येण्यास सहमती दर्शवल्यानंतर विरोधकांमध्ये एकीचे वातावरण निर्माण होऊ लागले आहे. काँग्रेसचे नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी बोलावलेल्या बैठकीला काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी हे आले तसेच द्रमुक, राष्ट्रवादी, शिवसेना राजद, समाजवादी पक्ष, आम आदमी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, नॅशनल कॉन्फरन्स, मुस्लिम लीग, रिव्होल्युशनरी पार्टी, केरळ काँग्रेस आदी पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी उपस्थिती दर्शवून पेगासस प्रकरणात झालेल्या कथित हेरगिरीच्या प्रकरणाच्या चौकशीचा आणि संसदेत त्याबद्दल चर्चेचा मुद्दा लावून धरण्याचा निर्धार केला. त्याचे पडसाद संसदेमध्ये उमटले आणि सातत्याने कामकाज रोखून विरोधकांनी आपली शक्ती दाखवून दिली आहे. कामकाज बंद पाडण्यासाठी गोंधळ घालणाऱया खासदारांचे निलंबन करून सत्ताधारी पक्षानेही या प्रकरणात ठाम भूमिका घेतली आहे. मात्र 2019 च्या निवडणुकीपूर्वी एकत्र येण्याच्या मुद्यावरून भरकटलेली विरोधकांची गाडी दोन वर्षांनी का होईना नवे डबे जोडून पुन्हा धावण्याच्या तयारीला लागली आहे. अर्थात जेवढे पक्ष काँग्रेसच्या बैठकीला हजर होते तितकेच पक्ष अद्यापही आपली भूमिका स्पष्ट करू शकलेले नाहीत. एकजुटीला अजूनही म्हणावा तितका प्रतिसाद लाभलेला आहे असे म्हणता येणार नाही. ज्या राज्यांमध्ये भाजपची थेट लढत प्रादेशिक शक्तींशी होती त्यातील बहुतांश पक्ष या निमित्ताने एकजूट होताना दिसले. मात्र बिजू जनता दल, तेलगू देसम पक्ष, तेलंगणा राष्ट्र समिती या दक्षिणेतील शक्ती नेहमीप्रमाणे तळय़ात मळय़ात आहेत. त्यांचे सहेतुक तटस्थपण उत्तरेतही दिसते. हरियाणा आणि पंजाबसारख्या राज्यात जिथून शेतकरी मोठय़ा प्रमाणात सरकारच्या विरोधात दिल्लीच्या सीमेवर येऊन बसला आहे, तिथेही स्थानिक निवडणुकांना डोळय़ासमोर ठेवून तिथले पक्ष पुढची वाटचाल करत आहेत. त्यामुळे मोदी सरकारच्या विरोधात शक्ती एकवटण्याच्या प्रयत्नांना अजून बरीच मजल मारावी लागणार आहे. एकेकाळी काँग्रेसच्या एकछत्री अमला विरोधात बिगर काँग्रेसी पक्षांची बडी आघाडी करण्याचा प्रयत्न केला जात असे. काँग्रेसच्या विरोधात प्रादेशिक शक्तींना सोबत घेऊन काँग्रेसला आव्हान देत. आता देशातील परिस्थिती उलट झाली असून भाजपच्या विरोधात बडी आघाडी करण्याचे प्रयत्न वेगवेगळय़ा मार्गाने सुरू आहेत. मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रातील ज्ये÷ नेते शरद पवार यांनी त्याबाबतचे एकमत करण्याचा प्रयत्न केला. वाजपेयींच्या काळात ज्यांची चलती होती अशा यशवंत सिन्हा आणि सुधींद्र कुलकर्णी यांना पुढे करून राष्ट्र मंचच्या माध्यमातून देशातील काही प्रश्नांवर चर्चा आणि दबाव घडवून आणण्याचा पहिला प्रयत्न झाला. पवार यांच्या घरात ही बैठक होत असतानाही शिवसेनेचा प्रतिनिधी हजर नव्हता आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही आता ही वेळ नसल्याचे सांगून आपला पक्षही त्याबाबत फारसा गंभीर नसल्याचे दाखवून दिले होते. या उपक्रमाला फार काळ लोटलेला नाही. मात्र आता, संसद अधिवेशन काळात काँग्रेसला स्वतःच्या पुढाकाराने अशी आघाडी करावी असे वाटू लागले आहे. त्यासाठीच खर्गे यांना पुढे करून बैठक घेण्यात आली. काँग्रेसचे अध्यक्षपद स्वीकारण्यास तयार नसलेले राहुल गांधी या बैठकीस हजर राहिले. याचा अर्थ अत्यंत अल्पकाळात त्यांनी आपले मत बदलले असाच होतो. काँग्रेसला सोबत घेतल्याशिवाय विरोधी पक्षांची एकी होऊ शकत नाही असे वक्तव्य चाणाक्ष शरद पवार यांनी जाहीरपणे केल्याने आणि आता भावी पंतप्रधान असे दुसऱयाला म्हणा असे वक्तव्य केल्याने त्यांच्या मनोभूमिकेत बदल झाला असावा. बंगालमधील हुतात्म्यांना श्रद्धांजली देण्याच्या निमित्ताने ममता बॅनर्जी यांनी देशातील बहुतांशी विरोधी पक्षांना बंगालात आमंत्रित केले होते. पेगासस प्रकरणात आरोप-प्रत्यारोप होत असताना केंद्रातल्या सत्तेलाच ‘प्लास्टर’ घातले पाहिजे अशी रोखठोक भूमिका ममता यांनी घेतली होती. त्या समारंभास काँग्रेसच्या प्रतिनिधींनी हजर राहणे म्हणजे सोनिया गांधी यांनीही विरोधी आघाडीत सहभागी होण्यास अनुकूलता दाखवली याचेच निदर्शक होते. मंगळवारी ममता यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची 45 मिनिटे भेट घेऊन चर्चा केली आणि त्यामध्ये विरोधकांनी एकत्र येण्यावर त्यांचे अधिकृत एकमत झाले. भाजपला हरवण्यासाठी सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येणे ही काळाची गरज आहे, असे सांगतानाच या आघाडीचा चेहरा परिस्थितीवर अवलंबून असेल, आपण आपली मते लादणार नाही, सर्वसंमतीने एक नेता ठरवला जाईल असे सांगून नेतृत्व स्पर्धा नसल्याचे ठसविण्याचा एक प्रयत्न केला कारण त्यावरूनच निवडणुकीत आघाडी फसली होती. तरीही यापुढे भाजपसाठी संसदेत आणि प्रत्येक राज्यात ही डोकेदुखीची बाब ठरणार आहे. यापुढच्या प्रत्येक अधिवेशनात बहुमत असूनही सत्ताधारी पक्षाला कठोर टीकेला आणि प्रखर विरोधाला सामोरे जावे लागेल. यापूर्वी काँग्रेसने कामकाजावर बहिष्कार टाकला तरी सत्ता पक्षाच्या खासदारांचे प्रश्न घेऊन संसद चालवणे आणि गतीने कायदे संमत करून घेणे सरकारला सोपे होते. राज्यसभेत विरोधकांमध्ये फूट पाडणे, काठावरच्या पक्षांना संभ्रमित करणे भाजपला यापुढे अवघड जाणार आहे. पण म्हणून विरोधकांची ही शक्ती केवळ संसदेचे कामकाज बंद पाडण्यासाठी उपयोगात न येता ती जनतेच्या हितासाठी संसदेत चर्चा घडवून आणण्यास उपयोगात आली पाहिजे. केवळ सत्ता पक्षाला हतबल करणे हा विरोधकांचा हेतू असेल तर त्यातून हाती काही लागणार नाही. लोकशाहीत विरोधी पक्ष प्रबळ हवा, एकजूट करून तो होत असेल तर त्याची भूमिका ही विधायकच हवी. त्याचा सत्ता पक्षाला धाक आणि जनतेला आधार वाटला पाहिजे.
Previous Articleविद्यमान जेत्या इलेन थॉम्पसनसमोर अनेक आव्हाने
Next Article टार्गेट ‘सिल्वर’, मिळाले ‘गोल्ड’!
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.