राज्यभरात भंडारी बांधवांची खंत : मुख्यमंत्री देणाऱया पक्षाला पाठिंबा
प्रतिनिधी /पणजी
गोव्याला स्वातंत्र्य मिळून 60 वर्षाहून अधिक काळ लोटला. या काळात 13 मुख्यमंत्री झाले. मात्र रवी नाईक वगळता भंडारी समाजाचा एकही नेता मुख्यमंत्री का बनला नाही असा सवाल तिसवाडी भंडारी समाजाने उपस्थित केला आहे. त्या पार्श्वभूमिवर आता राज्याच्या विविध भागात भंडारी बांधव एकत्र येऊ लागले असून एकूणच भंडारी समाजाचा मुख्यमंत्री व्हावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
सांत आंदे येथे घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत समाजाचे तिसवाडी तालुका संयुक्त सचिव तुषार बोरकर यांनी गोव्यातील केवळ भंडारी नव्हे तर बहुजन समाजाला एकत्रित पुढे नेण्यासाठी कार्य करण्याचा मनोदय व्यक्त केला. समाजातील अनेक व्यक्ती विविध क्षेत्रात आणि सामाजिक स्तरावर प्रगती करत असताना केवळ राजकारणात भंडारी समाजाला योग्य प्रतिनिधित्व मिळत नाही. आम्हाला सदैव मागास आणि गुलामगिरीतच ठेवायचे आहेत का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
गोवा मुक्ती नंतरही समाजाची अपेक्षेप्रमाणे प्रगती झालेली नाही. राजकीय नेत्यांनी समाजाचा केवळ वापर केला. समाजाच्या कोणत्याही अपेक्षांची पुर्तता केली नाही. त्यामुळे यापुढे जो पक्ष भंडारी समाजाला सर्वाधिक प्राधान्य देईल त्याला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला. तसेच सर्वांनी त्याला समर्थन द्यावे, असे आवाहन करण्यात आले.
वाळपई येथे झालेल्या पत्रकार परिषदेतही समाजाने राजकीय पक्षांनी भंडारी समाजाला नेतृत्व द्यावे, असे आवाहन केले. वाळपईत 40 टक्के भंडारी मतदार आहेत. हे सर्व एकत्रित आल्यास वाळपईत भंडारी उमेदवार नक्कीच विजयी होईल असा विश्वास समाजाचे नेते सुभाष नाईक यांनी व्यक्त केला.
प्रत्येक भंडारी व्यक्तीने निर्धार केल्यास भंडारी समाजातील मुख्यमंत्री होण्यापासून कुणीही अडवू शकणार नाही, असा विश्वास उसगाव येथील राजन नाईक यांनी व्यक्त केला.
पर्वरी येथे आयोजित पत्रकार परिषदेत मत व्यक्त करताना, भंडारी समाजातील व्यक्तीला मुख्यमंत्री म्हणून प्राधान्य देणाऱया राजकीय पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्धार करण्यात आला. चाळीसही मतदारसंघात भंडारी समाजाचे नेते असूनही पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेला असा भंडारी समाजाचा एकही नेता मुख्यमंत्री होऊ शकला नाही अशी खंत व्यक्त करण्यात आली.
दिपेश नाईक यांनी बोलताना पक्ष कोणताही असो, भंडारी व्यक्तीला मुख्यमंत्रीपदासाठी महत्व देत असेल तर त्या पक्षाला पाठिंबा देणार असल्याचे स्पष्ट केले आहे. भंडारी समाज एकसंध नसल्याने आजपर्यंत सगळे राजकीय नेते आणि राजकीय पक्षांनी गैरफायदा घेतल्याचे या बैठकीमध्ये समाजाच्या सदस्यांनी मत व्यक्त केले.
समाजाने निश्चय केल्यास 2022 च्या निवडणुकीत निश्चित इतिहास घडेल, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. राज्यातील 18 मतदारसंघात समाजाचे वर्चस्व आहे. एका पक्षाने असा पुढाकर घेल्यास क्रांती घडू शकते असे ते पुढे म्हणाले.