25 जून 1975 या दिवशी तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशव्यापी आणीबाणीची घोषणा करून लोकांच्या मूलभूत अधिकारांवर गदा आणली होती. शुक्रवारी या घटनेला 46 वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्त अनेकांनी आणीबाणीच्या काळातील आपल्या कटू अनुभवांना उजाळा दिला. आणीबाणी घोषित झाल्यानंतर सर्व काँग्रेसविरोधी नेत्यांची धरपकड करण्यात आली होती आणि त्यांना कोणताही गुन्हा नसताना तसेच कोणताही आरोप न ठेवता कारागृहात डांबण्यात आले होते.
यासाठी ‘मिसा’ या कायद्याचा मनमानी उपयोग करण्यात आला होता. हरियाणातील पी. एल. गोयल यांच्या परिवाराचा अनुभव विशेष क्लेशकारक आहे. त्यांच्या परिवारातील तीन पिढय़ातील सर्व पुरुष सदस्य कारागृहात बंद करण्यात आले होते. पी. एल. गोयल हे निवृत्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आहेत. आणीबाणीच्या काळातील ही आठवण सांगताना त्यांचे डोळे आजही पाणावतात.
पी. एल. गोयल हे दिल्ली विद्यापीठाचे सुवर्णपदक विजेते विद्यार्थी होते. 1975 मध्ये त्यांची हरियाणा न्यायिक सेवेसाठी निवड करण्यात आली होती. केवळ आरोग्य चाचणी व्हायची होती. ती होण्याआधीच 26 जून 1975 रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांचे वडील आणि आजोबा यांनाही गजाआड करण्यात आले. हरियाणाचे तत्कालिन मुख्यमंत्री बन्सीलाल यांची नाराजी हेच एकमेव कारण त्यांच्या अटकेसाठी पुरेसे ठरले होते. घरात पुरुष सदस्यच नसल्याने आणि इतर नातेवाईकही भीतीपोटी मदतीसाठी न आल्याने त्यांच्या कुटुंबाला हलाखीत दिवस काढावे लागले. आज 46 वर्षांनंतरही हे सर्व दृश्य आपल्या डोळय़ांसमोर जसेच्या तसे उभे आहे, असे पी. एल. गोयल म्हणतात.