पुरेशा शिक्षकांअभावी शिक्षणाचा सावळागोंधळ : जिल्ह्यात 990 शिक्षक पदे अद्याप रिक्त : बहुतांशी गावात सात वर्गांसाठी 1 ते 2 शिक्षक : खुल्या प्रवर्गातील 88 तर विमुक्त जाती प्रवर्गातील 3 पदे अतिरिक्त
कृष्णात चौगले/कोल्हापूर
शिक्षण हक्क कायद्यामध्ये 6 ते 14 वयोगटातील मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण देणे, सर्व शाळाबाहय मुलांना शिक्षण प्रवाहात आणणे, मुलांमध्ये शिक्षणाची आवड निर्माण करणे, गुणवत्ता वाढवणे, स्थलांतरीत व हंगामी स्थलांतरीत मुलांच्या पर्यायी शिक्षणाची सोय करणे आदी बाबींचा समावेश आहे. पण हे शैक्षणिक उपक्रम राबविण्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसतील तर कायद्याचा काय उपयोग ? असा सवाल प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांतून उपस्थित केला जात आहे. जिह्यात 20 जुलै 2022 अखेर मराठी व उर्दू माध्यम शाळांतील 990 शिक्षक पदे रिक्त असल्यामुळे शिक्षणाचा सावळागोंधळ सुरु आहे. चार वर्ग असणाऱ्या शाळेत एक, तर सात वर्ग असणाऱ्या शाळेत केवळ दोन शिक्षक असल्यामुळे एकाच वर्गखोलीत अनेक इयत्तांचे ‘धडे’ गिरवले जात आहेत.
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत सर्वसामान्य, गोरगरीब मुलांना मोफत शिक्षणाची सोय उपलब्ध होते. शिक्षणाची गुणवत्ता वाढविण्यासाठी शिक्षण विभागाकडून अनेक नवनवीन उपक्रम राबविले जात आहेत. पण हे उपक्रम शाळेतील प्रत्येक मुलांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुरेसे शिक्षकच उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. त्यामुळे या शाळांचा गुणात्मक दर्जा कायम राखण्यासाठी शासनाने रिक्त शिक्षक पदे त्वरीत भरण्याची गरज आहे. एखाद्या शाळेत 5 शिक्षक पदे मंजूर असतील तर त्या ठिकाणी केवळ दोन शिक्षक कार्यरत असल्याचे चित्र आहे.
जिह्यातील मराठी माध्यमांच्या शाळेमध्ये 972 शिक्षक पदे रिक्त आहेत. तर उर्दू माध्यम शाळांमध्ये 18 अशी एकूण 990 पदे रिक्त आहेत. यामध्ये मराठी माध्यम शाळांमध्ये खुल्या प्रवर्गाची 42 पदे आणि विमुक्त जाती प्रवर्गातील 3 पदे अतिरिक्त ठरली आहेत. तर उर्दु माध्यम शाळांमध्ये खुल्या प्रवर्गाची 46 पदे अतिरिक्त ठरली आहेत. खुल्या प्रवर्गातच अतिरिक्त पदे असल्यामुळे ईएडब्ल्यूएस (नागरीकांचा अर्थिक मागास) प्रवर्गाची 124 पदे भरता येणार नाहीत. तसेच खुल्या प्रवर्गातील ज्या शिक्षकांना अंतरजिल्हा बदली करून कोल्हापूरात यायचे आहे, त्यांची अतिरिक्त पदांमुळे बदली होणे अशक्य आहे.
ठिगळ लावायचं कुठं….!
साहेब आमच्या गावातील शाळेत सात वर्ग आहेत आणि शिक्षक दोनच आहेत. शिक्षकांनी कोणत्या वर्गावर शिकवायचे ? कोणत्या इयत्तेचे शिकवायचे ? आणि मुलांनी कोणत्या वर्गात बसायचे ? असे अनेक प्रश्न जि.प.च्या प्राथमिक शाळांमध्ये शिक्षण घेणाऱया विद्यार्थ्यांच्या पालक वर्गातून उपस्थित केले जात आहेत. आवश्यक शिक्षक द्या, अन्यथा आम्ही खासगी शाळांमध्ये आमच्या मुलांना पाठवतो असा इशारा पालकांकडून शिक्षकांना दिला जात आहे. पण जिह्यात मुख्याध्यापक, पदवीधर अध्यापक, आणि अध्यापक अशी एकूण 990 शिक्षक पदे रिक्त आहेत. त्यामुळे ‘आभाळ फाटलं, ठिगळ लावायचं कुठं ’ अशी शिक्षण विभागाची अवस्था झाली आहे. परिणामी गुणवत्तात्मक शिक्षणाचाही बोजवारा उडाला आहे.
ग्रामपंचायतींनी रिक्त शिक्षकांची उणीव भरून काढावी
सर्वसामान्य वर्गातील मुलांना शिक्षण देणाऱया प्राथमिक शाळा टिकल्या पाहिजे, त्यांची गुणवत्ता कायम राहिली पाहीजे यासाठी जि.प.तील अधिकाऱयांसह शिक्षक व पालक वर्ग नेहमी प्रयत्नशील असतात. पण त्यासाठी आवश्यक असणारी शिक्षक संख्याही तितकीच महत्वाची आहे. ही शिक्षकांची उणीव भरून काढण्यासाठी ग्रामपंचायतींसह दानशूर व्यक्तींनी गावातील डीएड, बीएड पदवीधारक युवकांना मानधन तत्वावर शिक्षक म्हणून नियुक्ती करण्याची गरज आहे. त्यामुळे सुशिक्षित बेरोजगार युवक, युवतींना रोजगार मिळेल. आणि मुलांचे शैक्षणिक नुकसानही होणार नाही. ग्रामपंचायतीकडे उपलब्ध असलेल्या निधीतून या मानधनाची तरतूद करता येईल.
मराठी माध्यम शाळातील रिक्त पद संख्या
अनुसूचित जाती 126, अनुसूचित जमाती 431, वि.जा.अ. 30, भ.ज.ब. 20, भ.ज.क. 18, भ.ज.ड. 71, वि.मा.प्र.मध्ये 3 पदे अतिरिक्त, इ.मा.व. 321, खुला प्रवर्गात 42 पदे अतिरिक्त असून एकूण 972 पदे रिक्त आहेत.
उर्दू माध्यम शाळांतील रिक्त पद संख्या
अनुसूचित जाती 2, अनुसूचित जमाती 17, वि.जा.अ. 6, भ.ज.ब. 2, भ.ज.क. 9, भ.ज.ड. 5, वि.मा.प्र.मध्ये 4 पदे अतिरिक्त, इ.मा.व. 19, खुला प्रवर्गात 46 पदे अतिरिक्त असल्यामुळे एकूण 18 पदे रिक्त आहेत.