अध्याय दहावा
ब्रह्म सत्य, जगत मिथ्या हे वेदांत्यानी सांगितलेले तत्त्व भगवंत उद्धवाला समजावून सांगत आहेत. उद्धवाने सर्व ऐकून घेतले आणि भगवंतांना प्रश्न विचारला की, देवा तुम्ही म्हणता हे पटतंय पण तुम्ही जग खोटं आहे असं सांगताय पण ते तर प्रत्यक्षात समोर दिसतंय मग ते खोटं कसं? हे मला समजाऊन सांगा. देव म्हणाले, जग खोटं आहे असं वाटण्याला मनुष्याचं अज्ञान कारणीभूत आहे. त्या अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश पडला की सगळं कसं स्वच्छ दिसू लागतं पण तोपर्यंत तो अंधारातल्या दोरीला साप समजण्याची चूक मनुष्य करत असतो. माणसाचं हे अज्ञान दूर व्हावं म्हणून माझा दिव्ययोग म्हणजे अलौकिक योग मी भगवद्गीतेत समजावून सांगितलाय तो लक्षात घे. त्याला दिव्य किंवा अलौकिक म्हणायचं कारण म्हणजे माझ्याशिवाय इतर लोकांना तो साधणं शक्मय नाही. लोकांच्या समजुतीसाठी असं म्हणायचं की, सगळी भुते माझ्यात सामावली आहेत पण हे आपलं म्हणायचं एवढंच, कारण मीच जर सर्व चराचर व्यापून वर दशांगुळे उरलोय तर इतरांना यात समाविष्ट व्हायला जागा कुठे आहे? थोडक्मयात इतर कुणालाही प्रत्यक्षात अस्तित्वच नाही हे लक्षात घे म्हणजे जग खोटं कसं हे तुझ्या आपोआप लक्षात येईल पण काही मंडळींना हे खरं वाटत नाही. ते माझं अस्तित्वच मान्य करत नाहीत. ज्याच्यामध्ये नास्तिकपणा असतो, त्याच्या दृष्टीने मी कधीच कुठेही नसतो आणि ज्याच्या मनात आस्तिक्मयबुद्धी असते, त्याच्यासाठी मी सर्व ठिकाणी उभा असतो.
भक्तीभावाने जो मला जेथे पाहतो, तेथे मी हजर असतो म्हणून तर प्रल्हादासाठी मी खांबात प्रकट झालो. उद्धवा माझी प्राप्ती होण्याला फारसे प्रयास करायची आवश्यकता नाही. मी सर्वात्मा, सर्वव्यापक आहे, असा ज्याचा निश्चयात्मक भाव असतो, तो माझा आवडता भक्त होतो आणि त्यालाच माझा ज्ञानठेवा मिळतो. आत्म्याच्या रूपाने मी मनुष्याच्या देहात वास करत असतो पण जो माझा एकनि÷ भक्त असतो त्याच्याबाबतीत उलटंच घडतं. तो आणि मी एवढे एकरूप झालेलो असतो की तो माझा आत्मा होतो आणि मी त्याचा देह बनतो उद्धवा! ‘एकात्मभक्ती’ ती हीच. ज्ञानसंपन्न ज्ञाते याच भक्तीने माझे भजन करतात. त्यांच्यामध्ये आणि माझ्यामध्ये अभेद प्रीती असते. याकरिता तूही याच रीतीने भजन कर. परमात्मा एक, नित्य व शुद्ध आहे त्याला मायामय संसारबंधन नाही आणि देहसंबंधही मिथ्या आहे हे लक्षात ठेव. हाच माझा खरा ‘आत्मबोध’ होय. मिथ्यासंबंधच जीवाला पडतो व नडतो तेव्हा आत्मज्ञानाने त्याची मुक्ती होते. तुला आत्तापर्यंत मीमांसकांचे मत कसे चुकीचे आहे हे समजावून सांगितले आणि अद्वैत हेच चराचरात श्रे÷ आहे हे लक्षात येणे हेच आत्मज्ञान होय. असे हे शुद्ध व पवित्र अद्वैत ज्ञान श्रवण करून उद्धवाला मोठा आनंद झाला आणि त्याच्या अंतःकरणात हर्ष दाटून येऊन, त्याने श्रीकृष्णाच्या मुखाकडे पाहिले. त्याच्या प्रेमाला भरते आले त्यामुळे तो स्वतःचे अस्तित्व विसरून गेला. उद्धवाला क्षणभर बेभान अवस्था प्राप्त झाली. तितक्मयात सावध होऊन तो श्रीकृष्णाच्या समोर स्थित झाला. अद्वैतभजनाने जे भजतात, तेच भक्त कृष्णाला आवडतात असे त्याच्या लक्षात आले. तेव्हा असे अद्वैतभजन मला कसे प्राप्त होईल हा प्रश्न त्याला पडला. त्यादृष्टीने त्याने देवांशी पुढील चर्चा सुरू केली. त्याने विचारले, हे कृष्णनाथा! आत्मा हा देहामध्ये असताना खरोखर बंधन पावतो का नाही? मनुष्य हा त्रिगुणांनी युक्त असतो. त्याला मुक्ती तर हवी असते मग तो त्रिगुणांनी युक्त असताना मुक्ती मिळते की गुण गेल्यावर मुक्ती मिळते हेच मला कृपा करून सांगा.
मला हा प्रश्न पडायचे प्रमुख कारण म्हणजे गुण असताना गुणांच्या पलीकडे कसे जायचं? कारण ज्याप्रमाणे अंगात ताप असेल तर बरं कसं वाटणार किंवा कीड लागल्यावर झाड कसे वाढणार त्याप्रमाणे अंगात गुण असताना त्यांच्या पलीकडे कसे जाणार? बरं हे गुणच देह चालवतात पण गुणयुक्त असताना ईश्वरप्राप्ती होत नाही असे जाणते म्हणतात पण गुणच नाहीसे झाले तर देहाचे अस्तित्वच नष्ट होईल मग ईश्वरप्राप्ती व्हावी कशी हे कृपया उलगडून सांगा.