ऐंशी सालची गोष्ट आहे. लोभस (लोणावळा टाइम्स) दिवाळी अंकात माझी कादंबरी (कोलाज) प्रकाशित झाली. नंतर हौस म्हणून मी इकडून तिकडून पैसे जमवले आणि तिचे पुस्तक छापले. मला अनेकदा मार्गदर्शन करणारे आणि मित्राप्रमाणे वागवणारे प्रा. स. शि. भावे यांना कादंबरी अर्पण केली. प्रती पुस्तकांच्या दुकानात विकायला आणि वर्तमानपत्रांना अभिप्रायासाठी पाठवल्या. अभिप्राय छापून येण्यासाठी विविध संपादकांकडे मनधरणीसाठी खेटे घातले. नानासाहेब गोरे यांनी आधी प्रस्तावना लिहायचे म्हटले होते. पण त्यांच्या कामांचे व्याप आणि माझा उतावीळपणा यांची सांगड जमली नाही. त्यांनी साधना साप्ताहिकात विस्तृत अभिप्राय लिहिला. ग. प्र. प्रधान सर, वसुधा माने, ह. मो. मराठे यांनी दिलेले संक्षिप्त अभिप्राय विविध मासिकात मी जाहिरात देऊन छापले.
एका संपादकांनी सुचवले, “एखाद्या ज्ये÷ व्यक्तीकडून अभिप्राय लिहून आणा.’’ मी भावे सरांना सल्ला विचारला. ते म्हणाले, “सुधा नरवणे यांना विनंती करा. त्या तुमच्या कादंबरीवर जाणकारीने आणि सहृदयतेने लिहितील.’’
सुधा नरवणे सकाळी आकाशवाणीवर आठवडय़ातून काही दिवस बातम्या सांगत. मी पुस्तकाच्या प्रतीवर त्यांचं नाव लिहून पाकिट बनवलं. सकाळी लवकर उठून आवरून रेडिओ लावून सज्ज झालो. रेडिओवर ‘सुधा नरवणे बातम्या…’ इतके ऐकल्याबरोबर पुस्तक घेऊन सायकलवर टांग मारली. थेट आकाशवाणीच्या दारात धापा टाकत उभा राहिलो. त्या बाहेर आल्यावर नमस्कार करून त्यांना पुस्तक दिले. विनंती केली. त्यांनी पुढच्या आठवडय़ात बोलावले. पुढच्या आठवडय़ात त्यांना त्याच पद्धतीने भेटलो. त्यांनी अभिप्राय लिहून आणला होता. तो बघून इतका आनंद झाला की त्यांचे आभार न मानता मी सायकलवर बसून भावे सरांच्या घरी गेलो. त्यांना दाखवला. अभिप्रायाची फोटोप्रत काढून संपादकांना दिली. ते म्हणाले, “मूळ प्रत हवी.’’ मला मूळ प्रत द्यावीशी वाटत नव्हती. मी परत आलो.
काही दिवसांनी कोलाजची दुसरी आवृत्ती प्रकाशित झाली तेव्हा वसुधा माने आणि सुधा नरवणे यांचे अभिप्राय तिच्या ब्लर्बवर छापले. दोघींना त्या प्रती नेऊन दिल्या. यानंतर नरवणे मॅडम दहा वर्षांनी भेटल्या त्या रवींद्र पिंग्यांच्या पुण्यातल्या घराच्या वास्तुशांतीच्या प्रसंगी. तीच आमची शेवटची भेट.
आता वयामुळे सायकल आणि इतर सगळीच वाहने स्वतः चालवणे सुटले. पण हे जुनेपाने उद्योग आठवायला मौज वाटते.