बरे होण्याचे प्रमाणही वाढून आता 41 टक्क्यांवर
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
भारतात कोरोनाबाधितांची संख्या विदसेंदिवस वाढतच असून शनिवार संध्याकाळ ते रविवार संध्याकाळ या चोवीस तासांमध्ये 6 हजार 767 ची भर पडली आहे. त्याचप्रमाणे याच कालावधीत 147 जणांच्या मृत्यू या विषाणू बाधेने झाला. तर 3 हजार 448 रूग्ण बरे होऊन घरी परतले, अशी माहिती देण्यात आली.
आता देशात बाधितांची एकंदर संख्या 1 लाख 31 हजार 868 झाली आहे. तसेच मृत्यूंची संख्या एकंदर 3 हजार 867 इतकी आहे. एकंदर 54 हजार 440 रूग्ण बरे झाले आहेत. रूग्ण दुप्पट होण्याचे प्रमाण आता 12 दिवसांवर आले असून बरे होण्याचे प्रमाण एकंदर बाधितसंख्येच्या 41.28 टक्के आहे.
महाराष्ट्रच आघाडीवर
रविवार संध्याकाळी 5 वाजेपर्यंत महाराष्ट्रात बाधितांची संख्या 47 हजार 190 इतकी होती. मृतांचे प्रमाणही महाराष्ट्रातच जास्त असून आतापर्यंत या राज्यात कोरोनामुळे 1 हजार 577 जणांचा मृत्यू झाला आहे. त्याखालोखाल गुजरातमध्ये 829, मध्यप्रदेशात 281, पश्चिम बंगालमध्ये 269 व दिल्लीत 231 अशी मृतांची संख्या आहे. राजस्थान 160, उत्तर प्रदेश 155, तामिळनाडू 103, आंध्र प्रदेश 56, तेलंगणा 49, कर्नाटक 42, पंजाब 39, जम्मू आणि काश्मीर 21, हरियाणा 16, बिहार 11, ओडीशा 7, केरळ 5, झारखंड 4, आसाम 4, चंदीगड 3, हिमाचल प्रदेश 3, उत्तराखंड 3 तर मेघालय 1 अशी अन्य राज्यांमधील मृत्यूंची संख्या आहे. 70 टक्क्यांहून अधिक मृतांना इतर गंभीर आजार होते.
तामिळनाडूने टाकले गुजरातला मागे
बाधितांच्या संख्येत तामिळनाडूने (15,512) गुजरातला (13,664) मागे टाकले आहे. दिल्लीत बाधितांची संख्या 12,910 आहे. त्याशिवाय राजस्थान 6,742, मध्यप्रदेश 6,371, उत्तर प्रदेश 6,017, पश्चिम बंगाल 3,459, आंध्र प्रदेश 2,757, बिहार 2,380, पंजाब 2,045, कर्नाटक 1,959, तेलंगणा 1,813, जम्मू-काश्मीर 1,569, ओडीशा 1,269, हरियाणा 1,132, केरळ 795, झारखंड 350, आसाम 329, उत्तराखंड 244, चंदीगढ 225, छत्तीसगड 214, त्रिपुरा 189, हिमाचल प्रदेश 185, गोवा 55, लडाख 49 तर अंदमान व निकोबार 33, मणीपूर 29, पाँडीचेरी 26, मेघालय 14, दादरा व नगरहवेली 2, अरूणाचल प्रदेश 1 तर सिक्कीम 1 अशी इतर राज्ये व केंद्रशासित प्रदेशांमधील बाधितसंख्या आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य विभागाने दिली.