भोंदू ज्योतिषांच्या मायाजालात अडकतोय महिलावर्ग, अपत्यप्राप्ती, सांसारिक अडचणी मुख्य कारणे
प्रतिनिधी /बेळगाव
कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे बहुतेकांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेकांना नोकऱया गमवाव्या लागल्या. उद्योगधंदे बंद करावे लागले. कौटुंबिक, सामाजिक प्रश्नांनी गंभीर स्वरुप धारण केले. याच परिस्थितीचा फायदा घेत भोंदू ज्योतिषी सर्वसामान्यांना आपल्या जाळय़ात ओढू लागले आहेत. पोलीस दलालाही या ज्योतिषांचे मायाजाल डोकेदुखीचे ठरू लागले आहे.
सकाळी घरात पडणारे वृत्तपत्र उघडले, की त्यामध्ये काही पत्रके आढळतात. कन्नड, मराठी, हिंदी, इंग्लीश सर्व भाषेतून पत्रके छापलेली असतात. मजकूर एकच असतो, 24 तासांत तुमच्या समस्या दूर केल्या जातील. केवळ एक फोन कॉलमुळे तुमचे नशीब बदलेल, असा दावा या मजकुरात केलेला असतो. काही ज्योतिषांनी तर सावजाचे इच्छित काम 48 तासांत पूर्ण झाले नाही तर पैसे परत करण्याची हमीही दिलेली असते.
या जाहिरातबाजीला भुलून खासकरून महिला मोठय़ा प्रमाणात फशी पडत आहेत. गुरुवारी सीईएनचे पोलीस निरीक्षक बी. आर. गड्डेकर यांनी बसवराज बुडबुडकेर (वय 37) रा. सिंदनूर, जि. रायचूर या ज्योतिषाला अटक केली आहे. केवळ एक फोन कॉलमुळे तुमच्या मुलाला नोकरी लागणार. प्रेमप्रकरणात यश मिळणार, कर्जाच्या विळख्यातून तुम्हाला बाहेर काढणार, पती-पत्नीमधील भांडण नाहीसे होणार, लग्न ठरत नसेल तर क्षणार्धात लग्नगाठ जुळून येणार, नोकरी-व्यवसायात बरकत येणार, अशी यशाची यादी वाढतच जाते. ही यादी पाहून सावज भुलते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे लग्नानंतर मूलबाळ होत नाही म्हणून अनेक दांपत्ये वेगवेगळय़ा दवाखान्याचे उंबरठे झिजवतात. औषधोपचारानंतरही अपत्यप्राप्ती झाली नाही तर साहजिकच अशा भोंदू बाबांच्या मोहजालात ते अडकतात. काहीतरी दोष असणार, कोणीतरी करणी केली असणार, कधीतरी उतारा ओलांडलेला असणार अशा थापा मारून दोष निवारणासाठी विधींसाठी पैशांची मागणी केली जाते. आपले काहीतरी भले होईल, या भाबडय़ा आशेने सावज या ज्योतिषांना पैसे देत जाते.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे ज्योतिषी कोण आहे, याची सावजाला माहिती नसते. केवळ पत्रकावरील मोबाईल क्रमांकावरून त्यांच्यात संभाषण सुरू असते. त्यांच्या खात्यावर त्यांनी मागतील तेव्हा तेव्हा ऑनलाईन रक्कम भरली जाते. 24 तासांची मुदत दोन महिन्यांवर जाते. त्यानंतर समस्या खूपच जटील आहे. दोष दूर करण्यासाठी केरळमध्ये महापूजा करावी लागणार, असे सांगितले जाते. त्यासाठी भरपूर तूप, रेशमी साडय़ा, बासमती तांदूळ मागविले जातात. शेवटी त्याचे फलित मात्र शून्यच असते.
अशाच पद्धतीने फसलेल्या अनेक महिलांनी आपली रक्कम वसूल करण्यासाठी पोलीस स्थानकात धाव घेतली आहे. ही समस्या आताचीच नाही. यापूर्वीही बेळगाव परिसरात अशा घटना घडल्या आहेत. ज्योतिषांच्या नादी लागून फशी पडणाऱयांमध्ये महिलांचाच भरणा अधिक आहे. खासकरून पती-पत्नीतील भांडण आणि अपत्यप्राप्तीसाठी ज्योतिषी मागेल ते देऊन कर्जबाजारी झालेल्यांची संख्याही काही कमी नाही.
एकदा प्रकरण पोलीस स्थानकापर्यंत पोहोचले तर या ज्योतिषांचा शोध घेणेही पोलीस दलासाठी अवघड जाते. बेंगळूर, रायचूर, गदग, तुमकूरमध्ये बसून हे ज्योतिषी सावजाला आपल्या इशाऱयावर नाचवत असतात. शाहूनगर येथील एका महिलेने पतीबरोबरच संबंध सुरळीत व्हावेत म्हणून तब्बल साडेतीन लाख रुपये ज्योतिषाच्या बँक खात्यात जमा केले होते. यासाठी अंगावरील दागिने गहाण ठेवले होते. मैत्रिणींकडे हातउसने घेतले होते. बेंगळूर येथील एका ज्योतिषाला अटक झाली, मात्र केवळ एक-दीड लाखच वसूल झाले.
दवाखाने फिरूनही अपत्यप्राप्ती झाली नाही म्हणून भोंदू ज्योतिषाच्या जाळय़ात अडकलेल्या महिलांची संख्याही मोठी आहे. दुर्गा परमेश्वरी, चौडेश्वरी, साईबाबा, राघवेंद्र स्वामी, आदी देवदेवतांची उपासना करून सिद्धी प्राप्त झाल्याचा हे ज्योतिषी दावा करतात. कौटुंबिक व सामाजिक कारणामुळे आत्मविश्वास हरवलेलेच या ज्योतिषांच्या नादी लागतात. एकदा सावजाची मनस्थितीत समजून आली की त्याला भीती घालत महापूजा, स्मशानपूजा झाली नाही तर तुझ्या समस्या वाढणार, कदाचित याच समस्यांमुळे तुला जीवही गमवावा लागणार, कौटुंबिक सौख्य हरविणार, अशी भीड घातली जाते. एकदा सावजाच्या मनात भीतीने घर केले की, ज्योतिषी सांगेल तसे पैसे जमा केले जातात. आपल्याशी फोनवरून बोलणारा कोण आहे? तो कुठला आहे? याची पुसटशीही माहिती नसताना त्याच्या बँक खात्यावर ऑनलाईन पैसे जमा करून फशी पडणाऱयांची संख्या वाढली असून पोलीस दलासाठीही अशी प्रकरणे डोकेदुखीची ठरू लागली आहेत.
भोंदू ज्योतिषाचेच उखळ पांढरे
वशीकरणाच्या नावाने मोठय़ा प्रमाणात लुबाडणूक केली जाते. पाच दिवसात स्त्राr वशीकरण, पुरुष वशीकरण करण्याचे सांगून सावजाला लुबाडले जाते. बेअब्रू होण्याच्या भीतीने अनेक जण अशा भोंदू ज्योतिषाविषयी तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. हे बाबा अधूनमधून आपले मोबाईल क्रमांक बदलत असतात. शत्रूपीडा, घटस्फोटासाठीही तोडगे देण्याचे सांगून मोठी रक्कम मागितली जाते. मात्र, यातून लाभ काहीच होत नाही. सावजापेक्षा भोंदू ज्योतिषीच फायद्यात असतो. फसवणूक टाळण्यासाठी सावधगिरी बाळगण्याची गरज आहे.