गोव्यात सध्या एकीकडे कोरोनाचे भूत मानगुटीवर आहे तर दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत.
गोवा राज्यात मागील काही काळात खाली आलेला कोरोनाचा आलेख पुन्हा वर जात आहे. राज्यात कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. कोरोनाचे रुग्ण दुपटीने सापडत आहेत. कोरोनाबाधितांचा आकडा धडकी भरवणारा आहे. राज्यात पुन्हा कोरोनाचा उद्रेक होत आहे. याला नागरिकांचा निष्काळजीपणा कारणीभूत आहे. जनजीवन हळूहळू पूर्वपदावर येत असताना पुन्हा कोरोनाने डोके वर काढले आहे. राज्यातील बहुतेक व्यवहार पूर्ववत सुरू झाल्याने नागरिकांना कोरोनाचा विसर पडला. सरकारी जाहीर कार्यक्रम, सार्वजनिक कार्यक्रम, नामकरण सोहळा, वाढदिन सोहळा, विवाह समारंभ, अंत्यविधी याला लोकांची गर्दी उडाल्याने साहजिकच कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. सध्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम जोरदार सुरू असली तरी ही लस घ्यावी की नको या विवंचनेत काहीजण आहेत. सध्या तरी कोरोनाला हद्दपार करण्यासाठी स्वयंशिस्त गरजेची आहे. केंद्र सरकारच्या निर्णयानुसार कोरोना प्रतिबंधासाठी राज्यात टीका उत्सव चालू आहे. गोवा राज्यातील टीका उत्सव 30 एप्रिलपर्यंत चालू शकतो. राज्यातील कोरोना प्रसार रोखण्यासाठी राज्यात कडक निर्बंध न लादता लसीकरणावरच अधिक भर देण्याचा निर्धार राज्य सरकारने केला आहे. लसीकरणाविषयी जनतेमध्ये असलेली भीती दूर होणे अत्यावश्यक ठरते.
गोव्यात सध्या एकीकडे कोरोनाचे भूत मानगुटीवर आहे तर दुसरीकडे पाणी टंचाईच्या झळा जाणवू लागल्या आहेत. या एप्रिल-मे महिन्यात या झळा तीव्र होणार आहेत. सध्या काही भागात पाणी टंचाईवर मात करण्यासाठी टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो परंतु टँकरद्वारे पुरविलेल्या पाण्याचा केवळ रस्त्यानजीक असलेल्या घरांनाच लाभ होतो व रस्त्यापासून आत असलेल्या घरांना याचा व्यवस्थित पाणीपुरवठा होत नाही. टँकरद्वारे होणाऱया पाणीपुरवठय़ाबाबतही घोटाळे सर्वश्रुत आहेत. सध्याच्या परिस्थितीत टँकरद्वारे पाणीपुरवठा हा पाणीटंचाईवर उपाय ठरत नाही तर प्रत्येक गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी आवश्यक पावले उचलणे आवश्यक ठरते. राज्यात आज पायाभूत साधनसुविधा विकसित होत असली तरी पिण्याच्या पाणीप्रश्नी अनियमिततेबाबत योग्य ते नियोजन न केल्यामुळे गोंयकारांना मोठय़ा प्रमाणात त्रास सहन करावे लागत आहेत. गोव्यात पाण्याची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सध्या जो पाण्याचा तुटवडा भासत आहे, त्याला निद्रीस्त सरकारबरोबरच पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी, कर्मचारीही जबाबदार आहेत. काही गावांनी पाणीप्रश्नी आंदोलने छेडण्यात आली असून काही ठिकाणी तर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. अनियमित पाणी पुरवठय़ासंबंधी जाब विचारला तर संबंधित अधिकाऱयांकडून असमाधानकारक, थातुरमातूर उत्तरे देऊन वेळ निभावून नेली जाते. हा पाणीप्रश्न पेटण्याची शक्यता आहे. गोव्यातील विविध भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे मोठे आव्हान संबंधित खात्याला पेलावे लागणार आहे. अनेक ठिकाणी नियमित गळती लागलेली जलवाहिनी, अनियमित व बेभरवशाचा वीजपुरवठा आदी कारणांमुळेही पाणी समस्या भेडसावत आहे. याबाबत कायमस्वरुपी उपाययोजना राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. गोव्यात बहुतांश ठिकाणी जलसाठे आहेत मात्र त्याकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. काही गावांमध्ये पाण्याचा साठा मोठय़ा प्रमाणात आहे मात्र पारंपरिक झरे नष्ट झाल्यामुळे पाणीपुरवठा होण्यास अडचणी निर्माण होत आहेत. या झऱयांना उर्जितावस्था प्राप्त करून दिल्यास बऱयाच प्रमाणात पाण्याचा प्रश्न सोडविण्यास मदत होईल. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ ही योजना प्रभावीपणे राबविण्यास सरकारने कामगिरी बजाविणे आवश्यक आहे.
निवडणूक जाहीरनाम्यात 24 तास पाणीपुरवठा हे सरकारचे वचन असते, मात्र हे वचन पूर्ण करण्यास सरकार असमर्थ ठरले आहे. काही गावात दिवसाआड पाणी, तेही अनियमित, असे प्रकार होत असल्याने गृहिणींची बरीच गैरसोय होते. आज गोव्यात घरांची संख्या वाढत असून घरगुती नळांचेही प्रमाण वाढले आहे. जलवाहिन्यांची क्षमता न वाढविल्याने बऱयाच प्रमाणात पाणी टंचाई जाणवत आहे. गोवा सरकारकडून अनेक विकासकामांवर कोटींची रक्कम उधळली गेली आहे मात्र पिण्याच्या पाणीप्रश्नी योग्य ती तरतूद न केल्याने पाण्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत चालली आहे. काही गावांनी विविध ठिकाणी जलवाहिनीला गळती लागून दररोज हजारो लीटर पाणी वाया जाण्याचा प्रकार घडत असतो. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होत नसल्याने टंचाई जाणवत आहे. वाढलेली लोकवस्ती, बेकायदा दिलेल्या जोडण्या तसेच काही व्यावसायिकांकडून बुस्टर पंप बसवून होणारी पाण्याची चोरी यामुळे पाणीपुरवठय़ावर परिणाम दिसून येत आहे. याकडे मात्र संबंधित यंत्रणेचे दुर्लक्ष होत आहे. आज राज्यातील काही मतदारसंघात आमदार बैठका घेऊन संबंधित अधिकाऱयांना सुरळीत पाणीपुरवठा करण्याच्यादृष्टीने सूचना करीत आहेत, विविध पाणीप्रकल्पांची घोषणा करीत आहेत. मात्र आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या केवळ मंत्री, आमदारांच्या घोषणाच किंवा आश्वासने ठरण्याची शक्यता आहे. पायाभूत साधनसुविधा विकसित करण्याच्यादृष्टीने फालतू प्रकल्पांवर नाहक खर्च करण्यापेक्षा गोव्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना गोवा सरकारने हाती घेणे आवश्यक ठरते. आगामी निवडणुकीपूर्वी तरी या संदर्भात कार्यवाही होणे आवश्यक ठरते.