गेल्या आठवडय़ात हरिभाऊ शिंदे ऊर्फ आमचे शिंदे सर यांचे वयाच्या त्र्याण्णवाव्या वषी निधन झाले. इयत्ता पाचवी ते सातवी ते आमचे वर्गशिक्षक होते. हिंदी विषय शिकवायचे. पाचवी आणि सहावीच्या वार्षिक परीक्षेत माझा वर्गात पहिला क्रमांक आला. प्रत्येक वेळी ते गुणपत्रिका आणि प्रगतीपुस्तक घेऊन सायकलवरून घरी आले आणि माझे कौतुक केले. सातवीनंतर माझी शाळा बदलली. संपर्क तुटला. यानंतर वीसेक वर्षांनी साधना साप्ताहिकात सदर लिहीत असताना मी शिंदे सरांवर लेख लिहिला. आम्ही मुले सरांच्या काय काय खोडय़ा करायचो त्याची कबुली दिली. तो लेख वाचून साधनेच्या पत्त्यावर सरांचे पत्र आले तेव्हा मी जाम भ्यालो होतो. पण ग. प्र. प्रधान सर हसत म्हणाले, भिऊ नकोस. हरिभाऊ भाबडा आहे. तुला तो छडी घेऊन मारायला येणार नाही.
यानंतर सरांशी पुन्हा संपर्क प्रस्थापित झाला. सर निवृत्त झाले होते. मंगळवार पेठेत त्यांचे छोटेखानी टुमदार घर होते. विविध सामाजिक उपक्रमात सक्रिय झाले होते. साहित्य परिषदेच्या निवडणुका होत तेव्हा प्रचारासाठी माझ्याबरोबर आलेल्या उमेदवारांना सर साहित्यविषयक प्रश्न विचारीत. उत्तरे समाधानकारक वाटली तर आपले मत देत आणि शिवाय आसपासच्या भागातील मतदारांचे पत्ते शोधायला मदत करीत. सरांमुळे लष्कराच्या भाकरी भाजण्याच्या उद्योगात मी थोडासा सक्रिय झालो. एखाद्या चांगल्या व्यक्तीची आमच्या भागात सभा असेल तर सभेच्या ठिकाणी मदतीला जाऊ लागलो. सर स्वतः निरपेक्ष वृत्तीने हे उद्योग करीत. त्यामुळे त्यांच्या बरोबर ही कामे करताना कधी संकोच असा वाटला नाही.
साधना साप्ताहिक किंवा पुण्यातल्या कोणत्याही वृत्तपत्रात माझे काही छापून आले तर ते वाचल्यावर भल्या सकाळी सर अंगणातूनच मला हाक देत. माझ्या लेखनावर त्यांची परखड भली-बुरी मते सांगत. त्यांना चहाला वर बोलावले तर नकार देत. 1985 पासून परवा परवापर्यंत एकदाच सर वरच्या मजल्यावरच्या आमच्या घरात आलेले. त्या दिवशी योगायोगाने माझा वाढदिवस होता. म्हणून आले होते.गेले कित्येक महिने सर रस्त्यावर भेटले नव्हते. वयामुळे घराबाहेर पडत नव्हते. गेले वर्ष तर कोरोनानेच खाल्ले. आता कोरोना गेला असे म्हणतात. पण तरी सर आता पुन्हा भेटणार नाहीतच. सोमवार-मंगळवार पेठांमधल्या रस्त्यांवरून सकाळच्या वेळी जाताना खादीचे जाकीट घातलेली एखादी लहानखुरी आकृती पाठमोरी दिसली तर क्षणभर सर असल्याचा भास होईल. पण ते आमचे शिंदे सर नसतील.