जी-7 परिषदेत पंतप्रधान मोदींचा नारा, पारदर्शित्वाची आवश्यकता केली व्यक्त
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सध्याच्या काळातील कोरोना विषाणूचा जागतिक उद्रेक आणि भविष्यातील संभाव्य उद्रेकांवर प्रभावी नियंत्रण मिळवायचे असेल, तर सर्वांना ‘एक जग, एक आरोग्य’ (वन अर्थ, वन हेल्थ) हे सूत्र अवलंबावे लागेल, असे महत्वपूर्ण प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. ते जी-7 देशांच्या परिषदेसमोर व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून भाषण करीत होते. भविष्यात असे विषाणू उद्रेक टाळायचे असतील तर ते उत्तरदायित्व पारदर्शित्व मानणाऱया समाजव्यवस्थेचे असेल, असेही मत त्यांनी व्यक्त केले. त्यांचे भाषण शनिवारी रात्री उशिरा झाले.
जी-7 देशांच्या या परिषदेला ‘आऊटरीच समिट’ म्हणून ओळखले जात आहे. ही परिषद सध्या ब्रिटनची राजधानी लंडन येथे सुरू आहे. ब्रिटन, कॅनडा, फ्रान्स, जर्मनी, इटली, जपान आणि अमेरिका हे या परिषदेचे स्थायी सदस्य देश आहेत. तर ब्रिटनने सध्याच्या परिषदेसाठी भारत, ऑस्ट्रेलिया, दक्षिण कोरिया आणि दक्षिण आफ्रिका या देशांना अतिथी देश म्हणून आमंत्रित केले आहे. भारत सोडून इतर सर्व देशांचे नेते ब्रिटनमध्ये उपस्थित आहेत. मात्र, पंतप्रधान मोदींनी कोरोना परिस्थिती लक्षात घेता भारतातच राहून परिषदेला संबोधित केले.
पेटंट प्रस्तावाला मान्यता द्या
कोरोना विरुद्धच्या लसींची साऱया जगाला आवश्यकता असून त्यासंबंधात पेटंटमधून सूट देण्यासंबंधीचा प्रस्ताव भारताने जागतिक व्यापार संघटनेसमोर (डब्ल्यूटीओ) दक्षिण आफ्रिकेसमवेत मांडला आहे. हा प्रस्ताव प्रगत देशांना मान्य झाल्यास प्रगतशील देशांची मोठीच सोय होणार आहे. म्हणून सर्व जी-7 देशांनी या प्रस्तावाला मान्यता द्यावी, असे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. हा प्रस्ताव ‘ट्रेड रिलेटेड आस्पेक्टस् ऑफ इंटेलेक्चुअल प्रॉपर्टी राईटस्’ (ट्रिप्स) या पाश्चात्य देशातील प्रथेतून कोरोना लसींना सूट द्यावी अशी मागणी या प्रस्तावात आहे.
जगाला संदेश द्या
जगाला भेडसावणाऱया विषाणू उद्रेकाला रोखणे हे साऱया जगाचे सामुदायिक उत्तरदायित्व आहे. त्यामुळे जी-7 देशांनी या परिषदेच्या व्यासपीठावरून जगाला ‘एक जग, एक आरोग्य’ हा संदेश द्यावा असेही आवाहन त्यांनी केले. सध्या जगातील सर्व देश एकमेकांच्या जवळ आले आहेत. अशा वेळी जगाच्या कोणत्याही भागात आरोग्यविषयक समस्या उद्भवल्या तर त्याचा साऱया जगावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे लोकशाही पद्धतीने चालणाऱया देशांवर विशेष उत्तरदायित्व आहे, अशी आपल्या भूमिकेची मांडणी पंतप्रधान मोदींनी केली.
एकजूट, नेतृत्व आणि एकवाक्यता
भविष्यकाळात विषाणू उद्रेकाचे संकट येऊ द्यायचे नसेल तर जागतिक एकजूट, सामायिक नेतृत्व आणि धोरणविषयक एकवाक्यता यांची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग भारताने कसा केला, हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले. सर्वांसाठी मुक्त असणाऱया ओपन सोर्स डिजिटल साधनांच्या साहाय्याने भारताने विषाणूसंपर्कात आलेल्यांचा शोध घेतला तसेच लस व्यवस्थापनही योग्यरित्या केले, असेही प्रतिपादन त्यांनी केले.
चीनच्या ओआरओबीला पर्याय
चीनने स्वतःचा प्रभाव जगावर निर्माण करण्यासाठी वन रोड वन बेल्ट ही योजना लागू केली आहे. त्यातून विविध देशांना मार्ग आणि समुद्राद्वारे जोडण्याची, तसेच तेथे चीनचा व्यापार वाढविण्याची त्याची योजना आहे. याला प्रत्युत्तर म्हणून अमेरिकेने आर्थिक श्रृंखला (इकॉनॉमिक बेल्ट) योजना आणली आहे. या योजनेची घोषणा अमेरिकेचे अध्यक्ष जो बायडन यांनी या परिषदेत केली.
भारताच्या प्रस्तावाला मोठा प्रतिसाद
भारताने कोरोना लसीकरता मांडलेल्या पेटंट सूट प्रस्तावाला जी-7 परिषदेत भरघोस पाठिंबा मिळत आहे, असे प्रतिपादन भारताच्या विदेश व्यवहार विभागाने केले आहे. या प्रस्तावामुळे जगभरात कोरोना नियंत्रणासाठी अनुकूल वातावरण निर्माण होईल. तसेच भविष्यकाळासाठीही हे पाऊल आश्वासक ठरेल असे मत अनेक देशांनी व्यक्त केले, असे विदेश विभागाने स्पष्ट केले आहे.