नाटकाची भूक आता वेगवेगळय़ा संस्था भागवत आहेत. ही अत्यंत स्वागतार्ह बाब आहे. ‘हिमालयाची सावली’ या नाटकाने तर रसिकांना एक वेगळाच आनंद दिला. त्याच वेळी सामाजिक कार्यात वावरताना किती निस्पृह असले पाहिजे, याचा दाखलाही दिला.
महिलांच्या उद्धारासाठी धोंडो केशव कर्वे यांनी आश्रम स्थापन केला. समाजासाठी ते अत्यंत निस्पृहपणे कार्यरत राहिले. परंतु त्याच वेळी कुटुंबाकडे त्यांचे दुर्लक्ष झाले. त्यांचे सुदैव इतकेच त्यांची पत्नी सावित्री उर्फ बयो ही कणखर होती. हिमालयासारखे समाजकार्य करणाऱया नानांसाठी ती सावली होऊन राहिली, म्हणून नाना जितके मोठे तितकेच बयोसुद्धा मोठी ठरते.
वसंत कानेटकरांच्या या नाटकामध्ये आजच्या समाजालासुद्धा लागू पडतील, असे अप्रतिम संवाद आहेत. बाई नेहमी सोसतेच. ‘एकदा बाळंतपणाच्या वेदना सोसल्या की पुढच्या साऱया वेदना सोसण्यासाठी ती सिद्ध होते’ किंवा ‘एकाचवेळी दोन सुधारणा समाजाच्या पचनी पडत नाहीत’. तसेच ‘सार्वजनिक क्षेत्रात काम करणाऱया माणसाच्या पायात प्रपंचाची बेडी नसावी,’ अशी वाक्मये आत्मपरीक्षण करण्यास भाग पाडतात.
आश्रम, पुनर्विवाह मंडळ यांच्या कार्यात गुंतून पडलेले नाना प्रपंचाकडे काहीसे दुर्लक्षच करतात. त्यांच्या पहिल्या पत्नीचा मुलगा आणि स्वतःची दोन मुले यांचा सांभाळ बयो करते. नानांचा चोख व्यवहार याबद्दल सार्थ अभिमान असणारी बयो प्रारंभी सातत्याने त्यांचे घराकडे दुर्लक्ष कसे झाले, हे सांगताना दिसते. नानांनीच सांभाळलेला केशव जेंव्हा त्यांची मुलगी ‘कृष्णा’ हिच्याशी विवाह करण्याचे ठरवितो तेंव्हा नातेवाईकांना संस्थेच्या कार्यकारी मंडळावर घेऊ नये, या नियमाला धरून केशवला दूर करण्याचे नाना ठरवितात. परंतु दुर्दैवाने कौन्सिल नानांनाच बाजूला काढते. हा धक्का त्यांना सहन होत नाही. ते पक्षाघाताचे बळी ठरतात. परंतु आपल्या पतीच्या कर्तृत्वाचा रास्त अभिमान असणारी बयो मुलांना आणि सर्वांनाच बाजूला ठेवून नाना तशाही अवस्थेत स्थापन करणाऱया आश्रमासाठी त्यांच्यासोबत जाते. या प्रयोगाचे मुख्य आकर्षण होते ‘शरद पोंक्षे’.
आजारामुळे रंगमंचापासून सहा महिने दूर असणाऱया शरद पोंक्षे यांनी पुनरागमन करताना आजही तितकेच सक्षम असल्याचे दाखवून दिले. पक्षाघातानंतर पाय ओढून चालतानाचा त्यांचा अभिनय लाजवाब. कोणत्याही परिस्थितीत तत्त्व आणि मूल्ये यांच्याशी तडजोड न करणारे, बयोचे तिरकस काटेरी बोलणे लक्षात येऊनही त्याकडे दुर्लक्ष करणारे, परंतु नेमक्मया वेळी त्याची आठवण करून देणारे पुढे विश्वासघातामुळे विदीर्ण झालेल्या नानासाहेबांच्या अनेक छटा त्यांनी अभिनयातून जिवंत केल्या. त्यांना तितकीच प्रगल्भ साथ बयो झालेल्या शुजा प्रभू-देसाई यांनी केली. लोकोत्तर पुरुषाची सावली होणे सोपे नाही. त्यांचे कौतुक, परंतु परिस्थितीचे चटके, मुलांचा अभिमान, नानांना फसविल्याबद्दल कौन्सिलबद्दल संताप अशा सर्व भावभावनांचे कल्लोळ आणि प्रभावी अशी संवादफेक यामुळे त्या लक्षात राहिल्या.
तातोबा झालेल्या विघ्नेश जोशी यांनी नानांबद्दलचा कमालीचा आदर, परंतु तेवढाचा धाक, त्याच वेळी बहिणीची काळजी, भाच्यांबद्दलचे प्रेम, काहीशा धांदरटपणाची झाक असलेली भूमिका रंगवून नेत मध्ये मध्ये हास्य विनोदाची पेरणी केली. त्यामुळे तेही लक्षात राहिले. या सर्व कलाकारांना सहकलाकारांची म्हणजेच आबाजी (जयंत घाटे), पुरुषोत्तम (कपिल रेडकर), कृष्णा राजशेखर, अरुंधती, ऋतुजा चिपडे, जगन्नाथ (ओंकार कर्वे), केशव (पंकज खामकर), पांडू (मकरंद नवघरे) व टांगेवाला (प्रकाश साबळे) यांनी उत्तम साथ दिली.
नाटकाचे नेपथ्य ही विशेष जमेची बाजू. संदेश बेंदे यांनी नानांचे घर आणि नंतर परशुरामांचा वाडा उभारताना परंपरा आणि नवता यांचा संगम साधला आहे. वेशभूषा मंगल केंकरे यांची असून राहुल रांगडे यांनी दिलेले संगीत वातावरण निर्मितीसाठी पूरक ठरले. हे नाटक संक्षिप्त न करता ते तीन अंकात सादर करण्याचा दिग्दर्शक राजेश देशपांडे यांचा निर्णय अचूक ठरला.
‘संस्थेसाठी माणसे असतात. माणसांसाठी संस्था नसते.’ ‘सार्वजनिक जीवनात काम करणाऱयांनी प्रपंच मांडताना विचार करावा, अन्यथा पराभूतच व्हावे लागते’ आणि ‘जा…! म्हणून सांगण्याआधी राजीनामा द्यावा आणि निघून जावे’, हा संदेश आज समाजात विविध स्तरावर काम करणाऱया सर्वांनी लक्षात आणि आचरणात आणण्याजोगा आहे.
मनीषा सुभेदार