मुंबई/प्रतिनिधी
महाड येथे जन आशीर्वाद यात्रेदरम्यान मुख्यमंत्र्यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी नाशिक येथे दाखल झालेल्या तक्रारीनुसार केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांनी मंगळवारी संगमेश्वर येथे अटक केली. यांनतर त्यांना महाडमधील कोर्टात हजर करण्यात आलं असता जामीन मंजूर करण्यात आला. दरम्यान, बुधवारी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी २७ ऑगस्टपासून जन आशीर्वाद यात्रेला पुन्हा सुरुवात होईल असं त्यांनी यावेळी सांगितलं. “दोन्ही निकाल माझ्या बाजून लागले आहेत. देशात अजूनही कायद्याचं राज्य आहे हे दिसून येतं. काही जण माझ्या मैत्रीचा आणि चांगुलपणाचा फायदा उचलतात हेही माझ्या लक्षात आलं आहे. तसेच यासर्व प्रकारावरून नारायण राणे यांनी महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान केलं. आता राणेंच्या विधानांचा समाचार घेत शिवसेना नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा राणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. एक मंत्री म्हणजे केंद्र सरकार नाही, असा खोचक टोला यावेळी त्यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत भुवनेश्वरचा दौरा अर्धवट सोडून मुंबईत परतलेत. यावेळी त्यांनी विमानतळावरच मीडियाशी संवाद साधला. महाराष्ट्राचा पश्चिम बंगाल होऊ देणार नाही, असं विधान नारायण राणे यांनी केलं होतं. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. काय करायचं आणि काय नाही हे ठरवणारे ते कोण? आम्ही आणि मोदी पाहून घेऊ काय करायचं ते. कोणीही काहीही विधान करत असेल तर त्यावर बोललंच पाहिजे असं नाही. केवळ एक कॅबिनेट मंत्री म्हणजे सरकार नाही. आम्हाला बोलायचंच असेल तर आम्ही नरेंद्र मोदींशी बोलू. अमित शहांशी बोलू. राष्ट्रपतींशी बोलू, असं सांगतानाच कुणाच्याही विधानावर प्रतिक्रिया दिल्याच पाहिजे असं नाही. आमच्याकडे कामं आहेत, असा टोलाही राऊत यांनी लगावला.