प्रज्ञा मणेरीकर/ पणजी
‘एक मनोहर कथा’ हे पुस्तक कोकणीत काढण्याचा विचार आहे. ‘आमचो भाई’ असे जेव्हा गोव्याचे लोक म्हणतात तेव्हा मराठीपेक्षा कोकणीतून पुस्तक जर आले तर ते जास्त आवडणारे आणि याची मला कल्पना आहे. क्षमता असलेल्या व्यक्तीकडून या पुस्तकाचे निश्चितपणे भाषांतर करेन. या पुस्तकात जे काही कमतरता असतील त्याची नोंद घेऊन पुढच्या कोकणी आवृत्त्यामधून तुल्यबळ अशा व्यक्तीकडून करून घेणार असल्याची माहिती ज्येष्ठ निवेदिका व लेखिका मंगला खाडिलकर यांनी दै. तरूण भारतच्या प्रतिनिधीशी पुस्तक प्रकाशन सोहळय़ानिमित्त बोलताना दिली.
मी ही स्वतः कोकणी भाषी आहे. माझे माहेर हे मंगळूरचे. त्यामुळे मी जी कोकणी बोलते ती गोव्याच्या कोकणीपेक्षा वेगळी आहे. मनोहर पर्रीकर हा माझा हृदयस्थ विषय आहे असल्याने हा विषय मी कधीच सोडणार नाही. काही कमतरता असेल त्याची नोंद मी पुढच्या आवृत्त्यामधून करीन आणि मग त्याची सर्वसमावेशक अशी कोकणी आवृत्ती मी नक्कीच तुल्यबळ अशा व्यक्तीकडून पुस्तक करून घेईन. कोकणीत आल्यानंतरच मला या विषयाला न्याय दिला असे वाटेल. कोकणीतून पुस्तक यावंच असे मलाही वाटते असे खाडिलकर यांनी सांगितले.
गेली दीड दोन वर्षे पर्रीकरांच्या जीवनाचा समग्र आढावा घेणारे असे पुस्तक लिहित होते. मनोहर पर्रीकर असे व्यक्तिमत्त्व होते की प्रत्येकाला त्यांच्यासंदर्भात बोलावसं आणि लिहावसं वाटते. गेली चाळीस वर्षे निवेदनाच्या क्षेत्रात मी असल्यामुळे त्यांचा पहिल्यांदा मुख्यमंत्री झाल्याचा कालखंड जो ऊर्जावान कालखंड होता. त्यानंतर विरोधीपक्षनेतेपद, मग पुन्हा मुख्यमंत्रीपदाची वैजयंती माला ही त्यांच्या गळय़ात पडली त्यानंतरचे देशाचे संरक्षणमंत्रीपद त्यांना मिळाले हा सर्व भाग एक डोळस नागरिक म्हणून पाहत होते. त्यांनी आपल्या प्रत्येक भूमिकेला योग्य न्याय दिला. त्यांच्या प्रखर आणि निस्पृह व्यक्तिमत्त्वामुळे मनोहर पर्रीकर हे फक्त गोव्याचे नेते न राहता ते संपूर्ण भारताला आवडणारे आणि संपूर्ण जनतेला आपलेसे वाटणारे नेते ठरले असे अभिमानास्पद उद्गार मंगलाताईंनी काढले.
मागील चाळीस वर्षे मी मुलाखती घेत आहेत. त्यामुळे मुलाखत आािण त्यातून निर्माण होणारा हृदयसंवाद ही माझी आवडती गोष्ट आणि आवडते माध्यम आहे. या माध्यमाच्या आधारे पर्रीकरांना जवळून जाणणारे, ओळखणारे, त्यांना विरोध करणारे, त्यांच्या कुटुंबातले, मित्रमंडळी, सहकारी, विरोधक, पत्रकार, विश्लेषक, यांच्या संवाद साधला आणि त्यांच्या संवादातून मला जो माणूस मिळाला तो मी वाचकांच्या स्वाधीन करायचा असे ठरवून हा सिलसिला दीड ते दोन वर्षापूर्वी सुरू झाला. त्यांनतर मी प्रत्येकाची मुलाखती घेत गेले. भावडांपासून ते भाजप कार्यकारिणीपर्यंत मुलाखती घेतल्या, नितीन गडकरी, सुमित्रा महाजन, सुरेश प्रभू, व इतरांच्या मुलाखती घेतल्या या मुलाखतीदरम्यान प्रत्येकाने त्यांच्याबद्दल आपुलकीने सर्व गोष्टी सांगितल्या. एक सुंदर व्यक्तिचित्र त्यांनी माझ्या समोर ठेवले.
या पुस्तकाची 2 ऑगस्ट 2006 साली सुरूवात झाली. नोव्हा गोवा हॉटेलमध्ये मी पर्रीकरांना भेटले त्यांना या पुस्तकांबद्दल सांगितले आणि त्यांची संमतीही घेतली. परंतु त्यानंतर त्यांच्या राजकीय कारकीर्देचा आलेख चढत गेला आणि त्यांना देशाचे संरक्षण मंत्रीपद मिळाले. संरक्षणमंत्रीपद सांभाळताना चैतन्यशील अशी कार्य संस्कृती निर्माण केली. जवानांपासून ते संरक्षण खात्यातील उच्चाधिकाऱयापर्यंत सगळय़ांना त्यांना आपल्या ज्ञानामुळे सकारात्मक दृष्टीने कार्यरत केले. त्यातून संरक्षणमंत्री असा मिळावा अशी भावना सार्वत्रिक निर्माण झाली. या सगळय़ा गोष्टींचे वेध पुस्तकात घेण्यात आले आहेत. पहाडा एवढे उत्तुंग व्यक्तिमत्त्व हळुहळु समजत जाणे मग संवेदनशील लेखणीतून मांडत जाण्याचा माझा प्रयत्न होता. आता वाचकांनी ठरवावे की हे कसे पुस्तक आहे ते असे मंगला खाडीलकर यांनी सांगितले.
निवेदन क्षेत्रातील अनुभव अतिशय सुंदर होता. निवेदन संवाद कला शिकविते. लेखनाकडे वळण्याचे कारणही निवेदनच आहे. तुमचा लिहिता हात ज्यावेळी तुमच्याकडे असेल त्यावेळेलाच तुमचे बोलणे हे आशयधन होऊ शकते. त्यामुळे निवेदन संवादाच्या प्रवासात अत्यंत महत्त्वाची अशी गोष्ट आहे. निवेदनाचे अनेक प्रकार आहेत. सूत्रसंचालन, निरूपण आणि मुलाखती. मनसोक्तपणे करत गेले. त्यातूनच माझे सदर लेखन सुरू झाले. याशिवाय याअगोदर तीन पुस्तके लिहिली असून हे माझे चौथे पुस्तक आहे. प्रत्येक पुस्तकात संवाद हाच धागा होता. चरित्र लेखन ही माझी आवडती गोष्ट आहे. यापूर्वी पं. प्रभाकर कारेकर, सुमन कल्याणपूर यांचे चरित्र लेखन केले आहे. प्रत्येक चरित्र लेखनाची मी वेगळी वाट चोखाळली. तसे भाईंचे चरित्र लिहित असताना मला संवाद हे निवेदनातूनच मिळालेले माध्यम उपयोगी पडले असे मंगलाताई म्हणाल्या.
लहानपणापासून आकाशवाणी माध्यमातून काम करत आले. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले आणि मी दूरदर्शन कार्यक्रमात ओढले गेले. परंतु निवेदनात करिअर करण्याची काही इच्छा नव्हती. अधिक कार्यक्रम करून यात कौशल्य करावे का असा विचार करत असताना मला व्यासपीठावरचे कार्यक्रम माझ्याकडे आले. संगीत हा माझा विषय होता आणि साहित्य ही माझी आवड होती. या दोन्ही विषयाचा मी अभ्यास करत होते. त्यावेळी व्यासपीठावरील पहिल्याच कार्यक्रमांमध्ये मला अरूण दाते, हृदयनाथ मंगेशकर, आशा भोसले, उषा मंगेशकर असाच मिळाला आणि गोडी लागली. पहिलाच कार्यक्रम उमेद देणारा ठरला. कुटुंबातून सकारात्मक पाठिंबा मिळाला. शेजाऱयांनी माझ्या मुलाला सांभाळले आहे. मोठी मोठी सदरे मी त्याकाळात लिहिली आहेत. कुटुंबाच्या पाठिंब्यामुळेच मी पुढे जात गेले. निरंतराची आवड आणि लेखनाची आवड पाहिजे. हे करत राहिले आणि पुढे जात राहिले. कठीण काळ असला तरी धैर्याने वागले पाहिजे असे खाडीलकर यांनी सांगितले. निवेदनाच्या कार्यशाळा गोव्यात पुष्कळ घेतल्या आहेत. सातात्याने घेते. संवाद शैली महत्त्व निर्माण झाले आहे. काम कितीही चांगले केले तरी ते लोकांपर्यंत पोहोचवता आले नाही तर ते काम लोकांपर्यंत पोहोचला वेळ लागतो त्यासाठी संवाद माध्यम महत्त्वाचे आहे. तुम्ही उत्तम निवेदक व्हा किंवा होऊ नका पण तुम्हाला योग्य शब्दात योग्य आवाजाचा वापर करत, योग्य शैलीत व देहबोलीसह बोलता आले पाहिजे. वाचन करणे, जास्तीत जास्त शब्दांची नाणे जमविणे व वापरणे आणि मुद्देसूद बोलणं आवश्यक आहे. लिहिता हात ठेवा. बोलत तोंड ठेवा. आत्मविश्वास ठेवा. धडाडीने गगनभरारी घेऊ शकता असा सल्ला त्यांनी युवापिढीला दिला.