प्रतिनिधी/ सातारा
शाहुनगर, गोडोली भागात सतत पाण्याची समस्या भेडसावते. नागरिक कधी खासगी टँकर मागवतात तर कधी पाण्याचा जार मागवतात. पाण्याची मागणी मोठी असल्याची बाब शाहुनगरातील एसटी कॉलनीतील अनिल म्हमाणे यांच्या निदर्शनास आली अन् त्यांनी गतवर्षी जागतिक महिला दिनाच्या दिवशीच वॉटर एटीएम सुरु केले. चोवीस तासात कधीही जा अन् एक रुपयांच्या एका कॉईनला एक लिटर पाणी दिले जात आहे. पाच रुपयांचा कॉईन टाकला की पाच लिटर पाणी येते. महिन्याला पाणी नेणार असाल तर पासेसची सोय करण्यात आलेली आहे. सातारा शहरात एकमेव वॉटर एटीएम असून शुद्ध पाणी पुरवठा नागरिकांना केला जात आहे.
पाणी म्हणजे जीवन. पाणी म्हणजे सर्वस्व असे बरच काही सांगितले जाते. कोणाला तहान लागली तर त्याच पाण्याला नाही म्हणू नये. मात्र, अनेक ठिकाणी पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. साताऱयातील शाहुनगर, गोडोली भागात सतत पाण्याची समस्या जाणवते. कधी अचानक पाणीच बंद होते. तर कधी पाण्याच्या पाईपला गळती लागते, असे प्रकार घडतात. त्यामुळे नागरिक पाण्यासाठी खाजगी टँकर मागवतात किंवा जार मागवतात. मात्र, नागरिकांची पाण्याची मागणी सततची ओळखून साताऱयातील एसटी कॉलनीतील अनिल म्हमाणे यांनी अडीच लाख रुपयांचे वॉटर एटीएम मशिन गतवर्षी बसवले. हे मशिन बसवण्यात आल्यानंतर चांगला प्रतिसाद मिळत आहे.
शहरातून अनेक नागारिक पाणी नेण्यासाठी येतात. शुद्ध पाणी दिले जाते. या संकल्पनेला भरभरुन प्रतिसाद मिळत असून मासिक मेंबर असतील त्यांच्याकरता 100 रुपयाचे कार्ड घ्यायचे अन् 15 रुपयांना 20 लिटर पाणी घेवून जायचे. दरवेळी फक्त 1 रुपयात शुद्ध साधे पाणी आणि थंड पाणी हवे असल्यास शेजारीच दुसरा कॉक आहे त्याच्यामध्ये दोन रुपयांना एक लिटर पाणी दिले जाते.