पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमचा संघसहकाऱयांना सल्ला
दुबई / वृत्तसंस्था
पाकिस्तानने भारताविरुद्ध आयसीसी टी-20 विश्वचषक स्पर्धेत ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर त्याचा आनंदोत्सव पाकिस्तानी पथकात होणे साहजिकच होते. पण, माजी कर्णधार मिसबाह-उल-हक व विद्यमान कर्णधार बाबर आझम यांनी संघातील सर्व खेळाडूंना केवळ एका विजयामुळे हुरळून न जाण्याची स्पष्ट सूचना केली. ‘भारताविरुद्धचा हा केवळ पहिला सामना होता. आपले लक्ष्य वर्ल्डकप जिंकण्याचे आहे’, अशा शब्दात बाबर आझमने आपल्या भावना व्यक्त केल्या.
टी-20 विश्वचषक स्पर्धेला महिन्याभराचा कालावधी बाकी असताना मुख्य प्रशिक्षकपदाचा राजीनामा देणे भाग पडलेल्या मिसबाह हकने खेळाडूंनी एकाग्रतेवर भर द्यावा, अशी यावेळी सूचना केली. पाकिस्तान संघाने अतिशय शिस्तबद्ध खेळ साकारला आणि सर्व रणनीती काटेकोर अंमलात आणली. त्याचमुळे, 10 गडी राखून एकतर्फी विजय संपादन करता आला, असे मिसबाह म्हणाला. वर्ल्डकप जिंकायचा असेल तर असाच शिस्तबद्ध खेळ प्रत्येक सामन्यात साकारावा लागेल, याचा त्याने पुढे उल्लेख केला.
पाकिस्तानचा संघ विंडीज दौऱयावरुन परतल्यानंतर मिसबाह व वकार यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिले आणि त्यानंतर दि. 13 सप्टेंबर रोजी माजी कर्णधार व समालोचक रमीझ राजा यांनी पीसीबी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारली होती.
मिसबाह व वकार यांनी जो सल्ला दिला, तोच सल्ला बाबर आझमने आपल्या खेळाडूंना भारताविरुद्ध विजय संपादन केल्यानंतर काही अवधीतच दिला होता. ‘आजचा विजय आपण निश्चितपणाने साजरा करणार आहोत. आपले कुटुंबिय देखील या आनंदात सहभागी होतील. पण, हा सामना झालेला आहे, हे अजिबात विसरु नका. आपल्याला स्पर्धेतील अन्य लढतीची नव्याने तयारी करावी लागेल’.
पाकिस्तानचा अंतरिम मुख्य प्रशिक्षक सकलेन मुश्ताकनेही आपला संघ भारताविरुद्ध विजयाने यानंतर पुढील सामन्यात आणखी जिद्दीने लढेल, अशी आशा व्यक्त केली. पाकिस्तानचा माजी सलामीवीर मोहसिन खानने नाणेफेक जिंकणे महत्त्वाचे ठरले, अशी प्रतिक्रिया यावेळी नोंदवली. माजी कसोटीवीर अकिब जावेदने या विजयाचे श्रेय शाहिनच्या भेदक माऱयाला दिले. हसन अलीने घेतलेल्या एका बळीमुळे भारतीय संघ बॅकफूटवर फेकला गेला, याचा त्याने पुढे उल्लेख केला. हसन अलीने त्या लढतीत सुर्यकुमार यादवला तंबूचा रस्ता दाखवला होता.
1992 विश्वचषक जेत्या संघातील सदस्य असलेल्या अकिबने आपल्या खेळाडूंना इतका आत्मविश्वास दाखवणे आपल्यासाठी स्वागतार्ह असल्याचे मत यावेळी नोंदवले. उमर गुलने मात्र भारतीय संघ डिवचला गेला असल्याने उर्वरित लढतीत अधिक कणखरपणे लढेल, असे सावध मत नोंदवले.
इनस्विंग गोलंदाजीवर भर देणे हा मुख्य प्लॅन होता ः शाहिन आफ्रिदी
आपल्या भेदक पहिल्या स्पेलच्या माध्यमातून गेमचेंजर ठरलेल्या शाहिन आफ्रिदीने इनस्विंग गोलंदाजीवर भर देणे, हाच आपला मुख्य प्लॅन होता, असे नमूद केले. शाहिनने 31 धावात 3 बळी घेतल्यानंतर हाच या सामन्याचा टर्निंग पॉईंट ठरला होता. या महत्त्वाच्या लढतीत त्याने उपकर्णधार रोहित शर्मा, अनुभवी सलामीवीर केएल राहुल व कर्णधार विराट कोहली यांचे महत्त्वपूर्ण बळी घेतले. यातील रोहित व केएल राहुलला टाकलेले चेंडू विशेष चर्चेत राहिले.
नाणेफेक, डय़ू फॅक्टर अधिक महत्त्वाचे ः विराट कोहली
न्यूझीलंडविरुद्ध पुढील लढतीसाठी काही दिवसांचा अवधी बाकी असल्याने या कालावधीत नव्याने तयारी करता येईल. पण, धावांचा पाठलाग करताना डय़ू फॅक्टरची समस्या येते, त्यावर काहीही करता येण्यासारखे नाही, ही मुख्य चिंता आहे, नाणेफेकीचा कौल आपल्या बाजूने लागणे देखील तितकेच महत्त्वाचे असते, असे विराट कोहली म्हणाला. पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी पराभव पत्करावा लागल्यानंतर तो माध्यमांशी बोलत होता.
‘आम्ही यापूर्वीच भरगच्च क्रिकेट खेळलो आहोत. पूर्ण हंगामात सातत्याने स्पर्धा झाल्या. अलीकडेच युएईमधील दमछाक करणाऱया वातावरणातच आयपीएल झाली आणि आता विश्वचषकाला सुरुवात झाली. त्यामुळे, जे मोठे ब्रेक आवश्यक असतात, ते मिळाले नाहीत’, असे विराट याप्रसंगी म्हणालाबॉक्स
पंतप्रधान इम्रान खान, पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांच्याकडून अभिनंदन
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान व पीसीबी अध्यक्ष रमीझ राजा यांनी भारताविरुद्ध ऐतिहासिक विजय संपादन करणाऱया पाकिस्तानी संघाचे अभिनंदन केले. बाबर आझम पुढाकाराने लढला, ते विशेष लक्षवेधी होते, रिझवान, आफ्रिदी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली, असे इम्रानने ट्वीट केले. रमीझ राजा यांनीही संघाचे अभिनंदन केले. पण, ही फक्त सुरुवात आहे. अद्याप बराच पल्ला गाठायचा आहे, याची आठवणही करुन दिली.
मोहम्मद शमीवर सोशल मीडियातून टीकास्त्र, आजीमाजी खेळाडू शमीच्या पाठीशी
भारताला पाकिस्तानविरुद्ध पराभव पत्करावा लागल्यानंतर सोशल मीडियावर मोहम्मद शमीला लक्ष्य केले गेले असून याचा आजी-माजी खेळाडूंनी रोखठोक समाचार घेतला. ‘धर्माचा रंग देऊन शमीवर टीका करणे आक्षेपार्ह आहे. आम्ही याबाबत पूर्णपणे शमीच्या पाठीशी आहोत’, असे ट्वीट विरेंद्र सेहवाग व हरभजन सिंग यांनी केले. शमी हा अलीकडील कालावधीत भारतीय संघाच्या सर्वोत्तम जलद गोलंदाजांपैकी एक असून मागील 5 वर्षांपासून त्याने सातत्यपूर्ण योगदान दिले आहे.