आरबीआयकडून कठोर धोरण- 1 ऑक्टोबरपासून लागू होणार नवा नियम
वृत्तसंस्था / मुंबई
एटीएममध्ये रोकडचा ठणठणाट आढळून येत असल्याने लोकांना अनेकदा गैरसोयीला तोंड द्यावे लागते. याचमुळे रिझर्व्ह बँकेने एटीएममधील रोकड संपल्यास बँकांवर दंड ठोठावण्याचा निर्णय घेतला आहे. हा नवा नियम 1 ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
आरबीआयच्या निर्देशांतर्गत 1 ऑक्टोबर 2021 पासून एखाद्या बँकेच्या एटीएममध्ये कुठल्याही महिन्यात जर 10 तास किंवा त्याहून अधिक काळापर्यंत रोकड उपलब्ध न राहिल्यास संबंधित बँकेवर 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला जाऊ शकतो.
एटीएमद्वारे लोकांना पुरेशी रोकड मिळत रहावी याकरता हा निर्णय घेण्यात आला आहे. काही बँका एटीएममध्ये रोकड जमा करण्यासाठी कंपन्यांची सेवा घेत असतात. अशा स्थितीत रोकड नसल्यास बँकेलाच दंड भरावा लागणार आहे. याच्या बदल्यात बँक संबंधित व्हाइट लेबर एटीएम कंपनीकडून दंडाची भरपाई करू शकते. जून 2021 पर्यंत देशभरात 2.14 लाख एटीएम होते.
कित्येकदा सलग सुटी, रोखतेची चणचण किंवा रोकड व्यवस्थापन करणाऱया कंपन्यांच्या व्यस्त कार्यक्रमामुळे एटीएममध्ये रोकडचा अभाव आढळून येतो. मुख्य शहरे सोडल्यास निमशहरी आणि ग्रामीण भागात एटीएममध्ये रोकड नसण्याची समस्या वारंवार दिसून येते. याचमुळे ग्राहकांची गैरसोय दूर करण्यासाठी आरबीआयने पाऊल उचलले आहे.
आरबीआयने एटीएमचे व्यवस्थापन अधिक काटेकोरपणे व्हावे याकरता थेट दंडात्मक कारवाईची नियमावली तयार केली आहे. बँकांनी तसेच व्हाइट लेबल एटीएम ऑपरेटर्स कंपन्यांनी एटीएममधील रोकड व्यवस्थापन, चलन भरणा याबाबत योग्य नियोजन करावे असे निर्देश देण्यात आले आहेत.