पुणे / प्रतिनिधी :
एल्गार प्रकरणाची सुनावणी पुणे सत्र न्यायालयातून मुंबईतील एनआयएच्या विशेष न्यायालयात हस्तांतरित करण्यात यावी. तसेच पुणे न्यायालयातील याप्रकरणातील सुनावणीची कागदपत्रे, दोषारोपपत्रे व इतर जप्त कागदपत्रे, पुरावे मुंबईत हलविण्यात यावेत, अशी मागणी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने पुण्यातील विशेष न्यायाधीश एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात केली आहे.
याप्रकरणी पुढील सुनावणी पुणे न्यायालयात सहा फेब्रुवारी रोजी होणार आहे. एनआयएने न्यायालयात केलेला अर्ज न मिळाल्याने त्यावर म्हणणे मांडण्यास वेळ मिळावा, अशी मागणी बचाव पक्षांकडून सोमवारी करण्यात आली. तर या प्रकरणातील तपास अधिकाऱयांना न्यायालयात सादर केलेली कागदपत्रे आणि सुनावणी मुंबईत घेण्याबाबत अद्याप कुठल्याही प्रकारच्या सूचना मिळाल्या नाहीत. त्यामुळे एनआयएच्या अर्जावर युक्तिवाद करण्यासाठी वेळ मिळावा, अशी मागणी जिल्हा सरकारी वकील उज्ज्वला पवार यांनी केली.