प्रतिदिन शेकडो जणांची मायदेशात धाव
वृत्तसंस्था/ गुवाहाटी
दशकांपासून भारतात अवैध वास्तव्य करणारे बांगलादेशी घुसखोर भीतीच्या छायेत मायदेशी परतू लागले आहेत. एनआरसी आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याने (सीएए) ही भीती निर्माण केली आहे. भारतातून परतण्याचा प्रयत्न करणाऱया शेकडो जणांना बांगलादेश बॉर्डर गार्ड्सने (बीजीबी) पकडले आहे. अशा अनेक जणांना बांगलादेशच्या पोलिसांनी ताब्यात घेत चौकशी सुरू केली आहे. पण पकडले गेलेल्यांपेक्षा अधिक प्रमाणात लोक सीमा ओलांडून बांगलादेशात शिरण्यास यशस्वी ठरले आहेत.
हे लोक दाखल होऊ नयेत म्हणून बांगलादेशने प्रयत्न चालविला आहे. बीजीबीने बांगलादेशच्या सीमावर्ती गावांमधील लोकांसोबत मिळून एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बांगलादेशात प्रवेश करणाऱया लोकांवर नजर ठेवून आहे.
भारतात कित्येक वर्षांपासून राहत असलेले घुसखोर एनआरसीच्या भीतीने छुप्या मार्गाने परत जात आहेत. सीमेवर त्यांना पकडण्याचा पूर्ण प्रयत्न केला जात आहे, पण काळोखात जंगलातून हे लोक सीमा ओलांडण्यास यशस्वी ठरत असल्याची माहिती बीएसएफच्या अधिकाऱयांनी दिली आहे.
आंतरराष्ट्रीय सीमेच्या मोठय़ा हिस्स्यात कुंपण तसेच वीजेची सुविधा नाही. हा भाग नदी आणि घनदाट जंगलांनी व्यापलेला असल्याने लोक छुप्या मार्गाने प्रवेश करण्यास यशस्वी ठरत असल्याचे बीएसएफ अधिकाऱयाने सांगितले आहे.
भीतीमुळे मायदेशी परतले
बांगलादेशच्या झिनाइदा जिल्हय़ातून नोव्हेंबरपासून आतापर्यंत हजारो लोकांनी बांगलादेशात प्रवेश केला आहे. बीजीबीने मागील महिन्यात सुमारे 300 जणांना पकडून पोलिसांच्या हवाली केले होते. मोठय़ा संख्येत लोक भारतातून बांगलादेशात येत आहेत. शेजारी देशाच्या सीमावर्ती क्षेत्रातील रहिवाशांचा तक्रारवजा सूर उमटला आहे. रोहिंग्यांनी यापूर्वीच समस्या वाढविली आहे. भारतातूनही लोक येऊ लागल्यास मोठी अडचण होणार आहे. दररोज 300 ते 400 लोक भारतातून बांगलादेशात प्रवेश करत आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.