कुलगुरु प्रा. रामचंद्रगौडा यांचे प्रतिपादन ः आरपीडीमध्ये राष्ट्रीय चर्चासत्र
प्रतिनिधी/ बेळगाव
देशात 1986 ला राष्ट्रीय शिक्षण धोरणात बदल करण्यात आला होता. त्यानंतर 34 वर्षांनी 2020 मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात बदल करण्यात येत आहे. नव्या धोरणामुळे अभ्यासक्रमासह परीक्षांच्या पद्धतीमध्ये बदल होणार आहे. यापूर्वीच्या अभ्यासक्रमात केवळ पुस्तकी ज्ञान होते. परंतु यापुढे आता व्होकेशनल शिक्षण दिले जाणार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षणासोबतच कौशल्यही मिळणार आहे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये नवभारत घडविणारा विद्यार्थी तयार करण्याची ताकद असल्याचे मत चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा. एम. रामचंद्रगौडा यांनी व्यक्त केले.
राणी पार्वतीदेवी कॉलेज ऑफ आर्ट्स ऍण्ड कॉमर्स, बेळगावच्यावतीने शनिवारी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर कार्यक्रमाचे आयेजन करण्यात आले होते. यावेळी रामचंद्रगौडा यांनी शैक्षणिक धोरणावर अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे, याविषयी माहिती दिली. व्यासपीठावर कॉलेज शिक्षण विभागाचे सहआयुक्त डॉ. वाय. एस. हनुमंतराया, बेंगळूर येथील युजीसीच्या शिक्षणाधिकारी डॉ. लता के. सी., सोलापूर येथील डॉ. संतोष कोटी, मुंबई येथील लेखिका रेखा देशपांडे, डीआयसीचे सहसंचालक रविंद्र मदीहळ्ळी, संस्थेच्या उपाध्यक्षा माधुरी शानभाग, प्राचार्या डॉ. शोभा नाईक उपस्थित होत्या.
डॉ. लता के. सी. यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाविषयी माहिती देत धोरण बनविण्यामागचा उद्देश स्पष्ट केला. देशभरात 7 हजारहून अधिक शिक्षण संस्था आहेत. यामधून करोडो विद्यार्थी शिक्षण घेऊन बाहेर पडतात. विद्यार्थ्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात असल्याने स्पर्धाही त्या मानानेच असणार आहेत. या सर्वांचा विचार करून विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार शिक्षण व कौशल्य प्राप्त करून देण्यासाठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण महत्त्वाची भूमिका बजावेल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात पहिले सत्र डॉ. लता के. सी. यांनी गुंफले. रेखा देशपांडे म्हणाल्या, भाषा हे संवादाचे माध्यम आहे. नव्या परिस्थितीशी चार हात करताना विद्यार्थ्याने बहुभाषिक असणे गरजेचे आहे, असे त्यांनी नमूद केले. डीआयसीचे रविंद्र मदीहळ्ळी यांनी व्यवसायांच्या संधींविषयी माहिती दिली. डॉ. संतोष कोटी यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अभ्यासाविषयी माहिती दिली. या चर्चासत्रामध्ये बेळगाव परिसरातील महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
मंजिरी गोरे यांनी स्वागतगीत सादर केले. मुकुंद गोरे यांनी त्यांना संगीत साथ दिली. प्रा. शोभा नाईक यांनी प्रास्ताविक तर माधुरी शानभाग यांनी स्वागत केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. प्रसन्ना जोशी व डॉ. शरयू यांनी केले. प्रा. एस. एस. शिंदे यांनी आभार मानले.