या घटनेला दूरसंचार कंपन्या जबाबदार असल्याचा आरोप – आगामी काळात सुधारणात्मक बदल
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ात राष्ट्रीय शेअर बाजारातील (एनएसई) व्यवहार जवळपास चार तास बंद राहिला होता. यामुळे गुंतवणूकदार मोठय़ा प्रमाणात चिंतेत राहिले होते. परंतु बुधवारी एनएसईने ट्रेडिंगचा कालावधी हा पाच वाजेपर्यंत वाढविला होता. ही समस्या कोणत्या कारणामुळे झाली, त्याचा शोध घेण्यासाठी प्रयत्न होणार असल्याचे मार्केट रेग्युलेटर सेबी यांनी सांगितले आहे.
येत्या काळात जर अशी समस्या उदभवल्यास त्यावर वेळेत उपाययोजना आखण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे. येत्या काळात सदर गुंतवणूकदारांची समस्या दूर करण्याचे सेबीने म्हटले आहे.
अचानक थांबलेल्या एनएसईमधील व्यवहाराची दखल सेबीने घेतली. यानंतर इंटरमीडियरी आणि मार्केट पार्टिसिपेंट्स यांना सर्वात मोठी समस्या निर्माण झाली. ही समस्या निर्माण होण्यास दूरसंचार सेवा जबाबदार असल्याचा ठपकाही यावेळी एनएसईने ठेवल्याची बाब समोर आली आहे.
तडजोडीसाठी वेळ वाढविली
एनएसईने बुधवारी मार्केट पार्टिसिपेंट्सला तांत्रिक बिघाड झाल्याने ही समस्या निर्माण झाल्याचे स्पष्ट केले आहे. बुधवारी सकाळी 11.40 नंतर बाजार बंद झाला होता. परंतु शेअर बाजार नेहमी दुपारी 3.30 वाजता बंद होतो. परंतु झालेले नुकसान भरुन काढण्यासाठी बुधवारी ट्रेडिंग कालावधी सायंकाळी 5 वाजेपर्यंत वाढवण्यात आला होता.
समस्या टाळण्यासाठी नवी योजना
मार्केट रेग्युलेटर यांनी दिलेल्या माहितीनुसार ब्रिटन, जपान, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडमध्येही व्यवहार याचप्रकारे ठप्प होत असल्याने चिंतेचा विषय राहिला आहे. भारतामधील या घटनेमुळे सेबीने ही समस्या सोडविण्यासाठी व्यापक स्वरुपात योजना उभारण्याचे निश्चित केले असून दंड आकारणीसह नवीन देखरेख ठेवण्याची व्यवस्था तयार करणार असल्याचे स्पष्टीकरण सेबीने दिले आहे.