युक्रेनमध्ये अडकलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना परत आणा
प्रतिनिधी /पणजी
युक्रेनमध्ये युद्धामुळे अडकून पडलेल्या गोमंतकीय विद्यार्थ्यांना परत आणण्याची मागणी करीत एनएसयुआयच्या गोवा शाखेतर्फे पणजीतील आझाद मैदानावर धरणे-निदर्शने करण्यात आली. केंद्र सरकारने या मागणीसाठी त्वरित पावले उचलावीत, अशी याचना एनएसयुआयतर्फे अध्यक्ष नौशाद चौधरी यांनी केली आहे.
एनएसयुआयच्या कार्यकर्त्यांनी ‘मोदी सरकार जागे व्हा’ असे फलक घेऊन गोमंतकीय विद्यार्थ्यांना युपेनमडून परत आणावे, अशी घोषणाबाजी केली. त्यांना परत आणण्याकडे मोदी सरकारचे दुर्लक्ष होत असून ते निवडणुकीत व्यस्त असल्याची टीका श्री. चौधरी यांनी केली आहे.
सुमारे 20 हजार भारतीय विद्यार्थी युक्रेनमध्ये शिक्षण घेत असून ते मायदेशात परत येण्यासाठी धडपडत आहेत. त्यांना योग्य तो सल्ला-दिशा देण्यास तेथील भारतीय दूतावास अपयशी ठरल्याचा ठपका एनएसयुआयने ठेवला आहे. विद्यार्थी हॉस्टेलमध्ये तसेच राहत असलेल्या घरांमध्ये अडकून पडले आहेत. त्यांना इकडून-तिकडे चला म्हणून सल्ले देण्यात येतात परंतु ते जाणार कसे, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांना सीमेपर्यंत येण्यासाठी भारतीय दुतावासाने व्यवस्था करावी, असे श्री. चौधरी यांनी नमूद केले. पंतप्रधान मोदी यांनी युक्रेन राष्ट्राध्यक्षांशी संपर्क साधून विद्यार्थ्यांना सुरक्षित बाहेर काढून भारतात येण्यासाठी चर्चा करावी, असे श्री. चौधरी यांनी सूचवले आहे.