प्रतिनिधी/ बेळगाव
कोरोनाच्या संकटाचा सामना करणाऱया प्रशासन आणि डॉक्टर यांच्या साहाय्यासाठी आता एनसीसी छात्रही पुढे सरसावले आहेत. एनसीसीच्या छात्रांनी सध्या मास्क तयार करणे आणि वितरित करणे हे कॅम्प सुरू केले आहे. बेळगावमधील एनसीसीच्या तीन विभागातील 50 छात्रांनी लॉकडाऊनचा काळ अशा पद्धतीने सत्कारणी लावला आहे.
समाजाला सध्या स्वयंसेवकांची गरज आहे हे लक्षात घेऊन 8 व 25 कर्नाटका एअर स्क्वॉड्रनच्या छात्रा पूजा जरली, नम्रता पाटील यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू झाला आहे. या दोघी संकेश्वरजवळील हेब्बाळ गावच्या असून त्यांनी आतापर्यंत 500 मास्क तयार करून ग्राम पंचायतींना दिले आहेत. उमा गवनाळी या गृहिणींनी हे मास्क त्यांना शिवून दिले आहेत. यासाठीचा खर्च छात्रांनीच उचलला आहे. 30 एप्रिलपर्यंत ग्रामपंचायतींना एक हजारहून अधिक मास्क देण्याचा त्यांचा संकल्प आहे.