तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे उपोषणाचा इशारा, एनसीसी छात्रांची मागणी
प्रतिनिधी/ बेळगाव
एनसीसी छात्रांसाठी पोलीस दल आणि लष्करी दलामध्ये 2 वर्षे राखीवता ठेवावी याचबरोबर इतर सरकारीनोकरीमध्येही 5 टक्के आरक्षण द्यावे याबाबत पंतप्रधान मोदींना आम्ही निवेदने दिली आहेत त्यामुळे 15 जानेवारीपर्यंत पं. मोदीनी याची दखल घेऊन आम्हाला ट्वीटद्वारे आमच्या मागण्या मान्य केल्याचे कळवावे अन्यथा आमरण आंदोलन छेडू असा इशारा खानापुर येथील एनसीसी छात्रांनी तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे दिला आहे.
नॅशनल कॅडेट कोअर (एनसीसी) म्हणजेच एकता, अनुशासन व अधिकार यांचा मिलाफ आहे. एनसीसीमध्ये विद्यार्थांना पोलीस दल आणि लष्करी दलाप्रमाणेच प्रशिक्षण दिले जाते. त्यामुळे कोणत्याही दलामध्ये आम्ही समर्थपणे सेवा बजावू शकतो त्यासाठी लष्करी किंवा पोलीस दलामध्ये आम्हाला प्राधान्य द्यावे अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
दरम्यान सरकारी नोकरीमध्ये 2 वर्षे मुदत वाढवून एनसीसी छात्रांना 5 टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी खानापुर येथील मुख्य रस्त्यावरुन छात्रांनी आम्हाला आमचा अधिकार द्यावा अशी मागणी करत तहसीलदार कार्यालयापर्यंत प्रभातफेरी काढली. तालुकास्तर व जिल्हास्तरावर निवेदन देऊनही आमची मागण्या पुर्ण झाल्या नाहीत तर जंतर मंतर मैदानावर आमरण उपोषण करु असा इशाराही निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी 200 हून अधिक एनसीसी छात्र उपस्थित होते.