काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांचे न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
वार्ताहर/ सांबरा
कर्नाटक सरकारच्या आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये गांधीनगर येथील जय किसान खासगी भाजी मार्केट बंद करण्यासंदर्भात आवाज उठवण्यात येणार असून आंदोलनकर्त्यांना न्याय मिळवून देणार असल्याचे आश्वासन केपीसीसीचे अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी दिल्यानंतर भारतीय कृषक समाजाचे राज्य अध्यक्ष व शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी आमरण उपोषण मागे घेतले.
बेळगाव दौऱयावर आलेल्या केपीसीसी अध्यक्ष डी. के. शिवकुमार यांनी शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास एपीएमसी येथे सुरू असलेल्या आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलनकर्त्यांचे म्हणणे ऐकून घेतले. त्यानंतर त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या आश्वासनानंतर सिद्धगौडा मोदगी यांनी नारळ पाणी पिऊन आपले आमरण उपोषण सोडले.
गांधीनगर येथील खासगी जय किसान भाजी मार्केट बंद करण्याच्या मागणीसाठी गेल्या दहा दिवसापासून एपीएमसीतील भाजी दुकानदारांनी आंदोलन छेडले आहे. तर भारतीय कृषक समाजाचे राज्य अध्यक्ष व शेतकरी नेते सिद्धगौडा मोदगी यांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत गेल्या सहा दिवसांपासून आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे या आंदोलनाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. व गैरप्रकारे जय किसान भाजी मार्केटला दिलेल्या परवानगीचा मुद्दाही चर्चेत आला आहे. सदर आंदोलनाला विविध संघटनांचा व शेतकऱयांचा दिवसेंदिवस पाठिंबा मिळत असल्याने एपीएमसीमध्ये वातावरण चांगलेच तापले आहे. अशातच व्यापारी प्रतिनिधी सतीश पाटील हे देखील सिद्धगौडा मोदगी यांच्यासोबत आमरण उपोषणाला बसले होते. मात्र त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. प्रारंभी डी. के. शिवकुमार यांनी सिद्धगौडा मोदगी यांची भेट घेतली व त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. तसेच आंदोलनकर्त्यांचेही म्हणणे ऐकून घेतले. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनमध्ये जय किसान खासगी भाजी मार्केटचा मुद्दा चर्चेत आणणार असून आंदोलनकर्त्या भाजी दुकानदारांना न्याय मिळवून देणार असल्याचे सांगितले. सरकारचे अधिकृत भाजी मार्केट असतानादेखील काहींनी गांधीनगर येथे जय किसान भाजी मार्केटला गैरमार्गाने परवाना दिलेला आहे. त्यामुळे एपीएमसीतील भाजी मार्केटचे नुकसान होत आहे. व भाजी दुकानदार अडचणीत आले आहेत. त्यासाठीच सदर आंदोलन हाती घेतले असल्याचे व्यापाऱयांनी यावेळी सांगितले. व न्याय मिळेपर्यंत भाजी दुकानदारांचे आंदोलन सुरूच राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आदोंलन सुरूच ठेवण्याचा निर्धार भाजी मार्केटमधील दुकानदारांनी केला आहे.
डी. के. शिवकुमार यांच्या भेटीप्रसंगी जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, विधानपरिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी, माजी मंत्री वीरकुमार पाटील, काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष विनय नावलगट्टी, राजू शेठ, किरणगौडा पाटीलसह गजानन शहापूरकर, बसनगौडा पाटील, सतीश पाटील, नितीन मुतगेकर, सदा पाटील, आनंद कंग्राळकर, कृष्णा पाटील, सुरेश मोदगेकर, संदीप अंबोजी, अप्पय्या चौगुले आदी व्यापारी उपस्थित होते.