प्रतिनिधी / नवी मुंबई :
कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी खबरदारी म्हणऊन नवी मुंबईतील एपीएमसी मार्केट बंद करण्यात आले होते. तसेच बाजार आवारात सामाजिक आंतराचे पालन होत नसल्याने मार्केट बंद करण्याचा निर्णय झाला होता.परंतु गेल्या 11 एप्रिलपासून बंद असलेलं एपीएमसीतील काही मार्केट बुधवार पासून सुरु झाले आहेत. परंतु त्यानंतर आज पर्यंत बंद असणारा फळ मार्केट येत्या सोमवार पासून सुरू करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे.
बाजार समिती प्रशासनाने फळ बाजार सुरू करताना काही निर्बंध घातले आहेत. त्यामध्ये बाजार आवारात 200 ते 250 गाड्यांचीच आवक होणार. त्यामध्ये हापूस आंब्यांच्या 150 गाड्यांचा समावेश असेल. तसेच, बाजार आवारात पूर्णपणे सोशल डिस्टनसिंग मेंटेन न झाल्यास बाजार पुन्हा बंद करण्यात येईल, अशी ताकीदही देण्यात आली आहे तर, शेतमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना बाजार आवारात रात्री 9 ते सकाळी 5 वाजेपर्यंत प्रवेश देण्यात येईल. बाजार आवारात सकाळी 7 ते दुपारी 3 पर्यंत व्यापार करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तर, संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सर्व वाहने बाजारातून बाहेर काढावी लागणार आहेत. बाजार आवारात येणाऱ्या ग्राहकांसाठी 15 हजार रुपये किमतीची फळं खरेदी करणाऱ्या ग्राहकांनाच प्रवेश देण्यात येईल.
बुधवार पासून नागरिकांसाठी महत्वाचे असलेले भाजीपाला व कांदा बटाटा मार्केट सुरू करण्यात आले.त्यानंतर अत्यावश्यक असलेला धान्य मार्केट सुरू करण्यात आले.आता सोमवार पासून फळ मार्केट सुरू करणार आहोत.फक्त बाजार आवारात येणाऱ्या सर्व घटकांनी नियमांचे तंतोतंत पालन करावे.तसेच सामाजिक आंतराबाबत दुर्लक्ष करू नये.