बेळगाव / प्रतिनिधी
एपीएमसीमध्ये शुक्रवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात शेती मालाची आवक झाली. मागील काही दिवसांपासून लॉकडाऊनमुळे शेतकरी बाजारात भाजी घेऊन आले नव्हते. परंतु शुक्रवारी मोठय़ा प्रमाणात आवक झाल्याने एपीएमसीमध्ये पाय ठेवण्यासही जागा नव्हती. शेतकऱयांनी शेतीमाल जरी बाजारात आणला असला तरी याला योग्य उचल नसल्यामुळे शेतकऱयांना व व्यापाऱयांना मोठे नुकसान सहन करावे लागले. कवडीमोल दराने भाजीची विक्री करण्याची वेळ शेतकऱयांवर आली.
बेळगाव एपीएमसीमधून गोवा, महाराष्ट्र व कर्नाटकात भाजी पाठविली जाते. बेळगाव तालुका तसेच आसपासच्या भागातून भाजीची आवक होत असते. लॉकडाऊनच्या निर्णयानंतर धास्ती घेऊन शेतकऱयांनी बाजारात माल आणला नव्हता. गुरुवारपासून एपीएमसीचा बाजार रूळावर आला आहे. शुक्रवारी पहाटेपासूनच वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कोबी, फ्लॉवर, भेंडी, वांगी, मिरची, टोमॅटो यांची आवक मोठय़ा प्रमाणात झाली. यामुळे एपीएमसीत तुडुंब गर्दी झाली होती.
भाजी बाजारात आली, परंतु इतर राज्यात पाठविली जात नसल्यामुळे भाजी एपीएमसीमध्येच पडून होती. लॉकडाऊनच्या धास्तीमुळे शहर व परिसरात भाजीची विक्री होत असल्यामुळे स्थानिक व्यापाऱयांकडून किरकोळ प्रमाणात भाजीची उचल सुरू आहे. त्यामुळे आलेली भाजी कवडीमोल दराने विक्री करण्याची वेळ शेतकऱयांवर आली. भाजीची विक्रीच होत नसल्याने शेतकऱयांना पैसा कोठून देणार? असा प्रश्न व्यापाऱयांसमोर होता. त्यामुळे शुक्रवारी दिवसभर बेळगावच्या एपीएमसीमध्ये भाजी तशीच पडून होती.
प्रशासनाने योग्य नियोजन करण्याची वेळ
किरकोळ बाजारात अव्वाच्या सव्वा दराने भाजीची विक्री होत असली तरी होलसेल बाजारात कवडीमोल दराने शेतकरी भाजी विकत आहे. प्रशासनाने योग्य नियोजन केले नसल्यामुळे शेतकऱयांना कृषी माल बाजारात आणलेले भाडेही परवडणारे नाही. त्यामुळे मोठय़ा आर्थिक संकटात बेळगावचा शेतकरी सापडला असून प्रशासनाकडून ठोस उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे मत व्यापाऱयांकडून व्यक्त केले जात आहे.
पोलिसांना करावा लागला सौम्य लाठीमार
शुक्रवारी सकाळी मोठय़ा प्रमाणात भाजीची आवक झाली. एकाचवेळी शेतकरी एपीएमसीत दाखल झाल्यामुळे सर्व व्यवस्थेचा बोजवारा उडाला. काहींशी गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्यामुळे पोलिसांना सौम्य लाठीमार करत शेतकऱयांना हुसकावून लावावे लागले. त्यामुळे अशाप्रकारे गर्दी होणार नाही, याची खबरदारी एपीएमसी प्रशासनाला घ्यावी लागणार आहे.
शेतकरीच देत आहेत घरपोच भाजी
एपीएमसीमध्ये कवडीमोल दराने भाजीची विक्री करण्यापेक्षा काही शेतकऱयांनी नामी शक्कल लढविली आहे. शेतकरी आपला कृषी माल एका गाडीमध्ये भरून तो गावोगावी जाऊन विक्री करीत आहे. प्रत्येक गल्लो-गल्ली जाऊन भाजीची विक्री केली जात असल्यामुळे ग्राहकांनाही त्याचा फायदा होत आहे. शेतकऱयांनी पिकविलेल्या भाजीला दलालांकडून योग्य दर मिळत नसल्यामुळे ही शक्कल लढविण्यात आली आहे.