कांदा, बटाटा आदी कुजून शेतकरी-व्यापाऱयांचे नुकसान टाळण्यासाठी व्यवस्थापकांनी लक्ष पुरविण्याची मागणी
वार्ताहर /अगसगे
एपीएमसीमध्ये परजिल्हय़ांतून मोठय़ा प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. अवकाळी पावसामुळे भिजलेला कांदा एपीएमसीमध्ये दाखल झाल्यानंतर त्याचा सवाल होतो. त्यानंतर तो कांदा व्यापारी दुकानांसमोरच तीन-चार दिवस साठवून ठेवतात. कांदा ओला असल्यामुळे तो खराब होतो आणि दुर्गंधी पसरते. त्यामुळे व्यापारी तो रस्त्याच्याकडेलाच फेकून देतात. त्यावरून वाहने जाऊन दलदल निर्माण होते व दुर्गंधीही पसरते. तेव्हा त्या कांद्याची विल्हेवाट लावण्यासाठी एपीएमसीने नियोजन करावे, अशी मागणी होत आहे.
सीमाभागातील महत्त्वाची कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणून ओळख असलेल्या या मार्केटमध्ये गलथान कारभार सुरू आहे. रोजच्या उलाढालीनुसार या ठिकाणी कोणत्याच सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. कांदा असो वा बटाटा किंवा इतर जिन्नस कुजल्यानंतर दुर्गंधी सुटते. त्यामुळे दुकानदार व्यापारी, शेतकरी, हमालवर्ग यांना याचा सामना करावा लागतो.
दूरदृष्टी ठेवून प्रकल्प राबवा
वास्तविक एपीएमसीने सडलेल्या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी किंवा त्यापासून खतनिर्मिती करण्यासाठी उपाययोजना करणे जरुरीचे आहे. कृषीप्रधान देशामध्ये शेती उत्पादकांसाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. उत्पादित माल अधिक दिवस टिकविण्यासाठी किंवा खराब झालेल्या मालातून उत्पन्न मिळावे यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. एखादा लहानसा प्रकल्प राबवून त्यामधून एपीएमसीने उत्पन्न घेणे फायद्याचे ठरणार आहे. यासाठी एपीएमसीने नियोजन करणे महत्त्वाचे आहे. दूरदृष्टी ठेवून प्रकल्प राबवावा, अशी मागणी होत आहे.
दुहेरी फायदा घेणे आवश्यक
कांदा, बटाटा व इतर जिन्नस कुजून व्यापाऱयांचे मोठे नुकसान होते. त्यासाठी एखादा लहानसा खत प्रकल्प राबविला तर त्यामधून दुहेरी फायदा होऊ शकतो. त्यासाठी एपीएमसी व्यवस्थापक व सदस्यांनी अभ्यासपूर्ण प्रयत्न करणे महत्त्वाचे आहे. याबाबत अभ्यास दौरा काढून त्याची पाहणी करणे महत्त्वाचे आहे.दरम्यान, महत्त्वाचे म्हणजे एपीएमसी कार्यालयाच्या बाजूलाच कुजलेले कांदे-बटाटे फेकले जातात. त्यामुळे त्या परिसरातही दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे भटकी कुत्री, जनावरे त्या ठिकाणी वावरत आहेत. तेव्हा खराब झालेल्या या मालाची विल्हेवाट लावण्यासाठी तातडीने पाऊल उचलणे गरजेचे आहे.