संतप्त व्यापारी बांधवांनी सचिवांना धरले धारेवर : विकासकामांची पाहणी ; प्रशासनाने लक्ष देण्याची गरज
वार्ताहर /कंग्राळी खुर्द
बेळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमधील पाणी, वीजपुरवठा, पथदीप, शौचालये, पाण्याचा निचरा होण्यासाठी गटारींची व्यवस्था, स्वच्छतेचा अभाव आदी समस्या निवारण्यासाठी प्रशासनाने साफ दुर्लक्ष केले आहे. याचा परिणाम बाजार समितीमधील शेतकरी, व्यापारी, कर्मचारी आणि खरेदीदार बांधवांवर होत आहे. तरी कृषी उत्पन्न बाजार समिती कार्यकारी अधिकारी आणि प्रशासनाने यांची गंभीर दखल घेऊन बाजार समितीमधील समस्या सिझनपूर्वी सोडवाव्यात, अशा आशयाचे निवेदन शनिवारी कृषी उत्पन्न बाजार समिती प्रशासनाला दिले. बाजार समिती सचिव डॉ. कोडीगौडा, व्यापारी प्रतिनिधी महेश कुगजी यांनी निवेदनाचा स्वीकार करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.
व्यापारी बांधवांनी सचिवांना धरले धारेवर
बाजार समितीमधील समस्या सोडविण्याबाबत निवेदन देण्यासाठी गेले होते. यावेळी सचिव आपल्या कार्यालयात होते. त्यावेळी व्यापारी बांधवांनी समस्यांबद्दल माहिती द्यावयास सुरुवात केली. मात्र सचिवांनी याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे संतप्त व्यापारी बांधवांनी सचिवांना चांगलेच धारेवर धरले. सचिव कार्यकारिणी विकास कामे करताना सहकार्य करत नसल्याचे सांगितले. त्यावेळी व्यापारी कृष्णा पाटील यांनी सचिवांची खरडपट्टी काढली. कार्यकारिणीचे विकास कामात योगदान असेलच मात्र संपूर्ण अधिकार हे शासननियुक्त सचिवांना असतात. त्यामुळे बाजार समितीमधील समस्यांना तुम्हीच जबाबदार आहात. आम्ही शासनाचा महसूल वेळेत भरतो, वेळेत न भरला तर तुम्ही दंडासह महसूल रक्कम भरून घेता. मात्र सोयीसुविधा देण्याकडे का दुर्लक्ष करता ? असा प्रश्न उपस्थित केला.
यावेळी व्यापारी विनायक होनगेकर, नगरसेवक मोहन बेळगुंदकर यांनीसुद्धा प्रश्नांचा भडिमार केला. त्यानंतर सचिव नरमले आणि त्यांनी बाजारपेठेतील समस्यांची व्यापाऱयांसमवेत पाहणी करुन त्या निवारणासाठी आपल्या अधिकारी वर्गाला सुचविले.
व्यापारी प्रतिनिधींनी दाखविल्या समस्या
व्यापारी प्रतिनिधी महेश कुगजी यांनी सचिव आणि व्यापारी बांधवांसमवेत मार्केट यार्डमधील विकासकामांची पाहणी केली. यावेळी ठेकेदारांच्या बेजबाबदारपणामुळे अनेक समस्या निर्माण झाल्याचे त्यांनी दाखवून दिले आणि विकास कामाबद्दल चालढकल न करण्याबद्दल सूचना केल्या.
यावेळी व्यापारी विश्वास घोरपडे, वाय. बी. चव्हाण, विनायक बाळाराम पाटील, नृसिंह पाटील, दत्ता पाटील, तुषार टुमरी, गजानन घोरपडे, योगेश होनगेकर, गजानन भातकांडे, केदारी पाटील, विनायक मोरे, अभिजित मोरबाळे, राहुल होनगेकर, शिवाजी शेट्टी, तारीफ खानापुरी, राजू जाधव, एस. के. देसूरकर, संजय पाटील, तानाजी हिरोजी आदी व्यापारी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.