ऑनलाईन टीम / मुंबई :
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून नवी मुंबईतील कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी) 11 ते 17 मे दरम्यान बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या काळात एपीएमसी मार्केटमधील अन्नधान्य, भाजीपाला, फळ, कांदे बटाटे, मसाला मार्केट पूर्ण पणे बंद राहणार आहे.
नवी मुंबईत गेल्या दहा दिवसांत कोरोनाचे 300 रुग्ण वाढले असून यात एपीएमसी बाजार आवारात 75 पेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. यामुळे नवी मुंबईतील नागरिकांनी, व्यापारी व कामगार संघटनांनी मार्केट बंद करण्याची मागणी केली होती.
त्यानंतर कृषी पणन विभागाचे प्रधान सचिव अनुप कुमार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेतली गेली. या बैठकीमध्ये 11 ते 17 मे दरम्यान पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला आहे.
तसेच यावेळी मार्केट बंद असले तरी पाचही मार्केटचंनिर्जंतुकीकरण केले जाणार आहे. बाजार समितीचे कामगार, माथाडी व सर्व घटकांची स्क्रिनिंग व आरोग्य तपासणी शासनातर्फे होणार आहे.
एपीएमसी बाजार समितीचे उपसचिव कृष्णकांत पवार म्हणाले की, मार्केट बंद असले तरी लोकांनी घाबरून जावू नये, अजून 15 दिवस पुरेल एवढे अन्नधान्य व इतर माल उपलब्ध आहे. सध्याच्या घडीला सर्व जीवनावश्यक वस्तू थेट मुंबईला नेण्यात येत असून या दरम्यान सर्व नियमांचे पालन केले जात आहे, असं ही त्यांनी यावेळी सांगितले.