माणसी एक किलो जादा तांदूळ देण्याचा निर्णय
प्रतिनिधी /बेळगाव
दारिद्रय़ रेषेखालील (अंत्योदय, बीपीएल) रेशनकार्डधारक लाभार्थ्यांना 1 एप्रिलपासून प्रतिव्यक्ती 1 किलो वाढीव तांदूळ मोफत दिला जाणार आहे. त्यामुळे गोरगरिबांना दिलासा मिळाला आहे.
दारिद्रय़ रेषेखालील जनतेचा आर्थिक स्तर उंचावावा, याकरिता शासनाकडून मोफत रेशन पुरवठा केला जातो. एप्रिलपासून या पुरवठय़ात वाढ केली जाणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांना अतिरिक्त रेशन मिळणार आहे. कोरोना संकटकाळात रेशनचा अतिरिक्त पुरवठा केला जात आहे. यामध्ये केंद्र सरकारकडून 5 किलो तर राज्य सरकारकडून 5 किलो असे एकूण 10 किलो रेशन प्रतिमाणसी वितरित केले जात आहे. मात्र केंद्र सरकारचा रेशन पुरवठा केवळ मार्चपर्यंतच केला जाणार असून त्यानंतर लाभार्थ्यांना केवळ राज्य सरकारकडून मिळणारा 5 किलो तांदूळ वितरित होणार आहे. त्यामुळे आता सरकारने एप्रिलपासून 1 किलो तांदूळ अतिरिक्त देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे 6 किलो तांदूळ वितरित होणार आहे.
केंद्राचा तांदूळ कमी होणार
लॉकडाऊनपासून लाभार्थी कुटुंबातील प्रत्येक सदस्यामागे 10 किलो तांदूळ दिला जात आहे. मात्र पुढील महिन्यापासून यातील पाच किलो कमी होणार असून, केवळ राज्य सरकारचा पाच किलो तांदूळ दिला जाणार आहे. गतवषी अन्न व नागरी पुरवठा खात्याने ज्वारीसह तूरडाळ देण्याचा प्रस्ताव ठेवला होता. मात्र अद्याप लाभार्थ्यांना ज्वारी आणि तूरडाळ वितरित करण्यात आली नाही. शिवाय हरभराडाळ देण्याचाही निर्णय घेतला होता. काही दिवस हरभराडाळ वितरित करण्यात आली होती. मात्र त्यानंतर वितरण थांबले. त्यामुळे सध्या लाभार्थ्यांना केवळ तांदूळच वितरित करण्यात येत आहे.