प्रतिनिधी / कोल्हापूर
कोरोना प्रतिबंधासाठी देशात व राज्यात सुरु असलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योग, व्यवसाय बंद आहेत. या आपत्कालिन स्थितीत सर्वसामान्य नागरिक अन्नधान्यापासून वंचित राहू नये यासाठी केंद्र व राज्य सरकारने गहू, तांदळाचे वितरण सुरु केले आहे. एप्रिल महिन्यातील धान्य वितरणासाठी मार्चमध्येच रेशन दुकानांकडे धान्य पोहोच केले आहे. तरीही शासकीय धान्य गोदामामध्ये 1 हजार 473 क्विंटल गहू आणि 1 हजार 467 क्विंटल तांदूळ शिल्लक कसा ? तसेच महापूर काळातील 1 हजार 71 क्विंटल गहू आणि 1 हजार 1 क्विंटल तांदूळ शिल्लक कसा ? असा सवाल शिवसेना जिल्हा प्रमुख विजय देवणे व संजय पवार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी दत्तात्रय कावितके यांना केला. सर्वसामान्य जनता धान्यापासून वंचित असताना धान्य शिल्लक राहतेच कसे अशी विचारणा करत कावितके यांना धारेवर धरले.
शासकीय धान्य गोदामाध्ये महापूर काळातील आणि एप्रिल महिन्यातील धान्य मोठय़ा प्रमाणात शिल्लक असल्याची माहिती मिळताच विजय देवणे व संजय पवार यांनी धान्य गोदामातील शिल्लक साठय़ाची चौकशी करण्याची मागणी केली. यावेळी पुरवठा विभागातील अधिकाऱयांसह केलेल्या चौकशीमध्ये महापूर काळातील आणि एप्रिल महिन्यातील धान्य शिल्लक असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे शिल्लक धान्य त्वरीत सर्वसामान्य जनतेला वितरीत करावे अशी मागणी कावितके यांच्याकडे करण्यात आली. तसेच कोरोनाच्या साथीत पत्ता बदललेले, धान्य घेतले नाही म्हणून नाव कमी झालेले, रेशनकार्डला आधार लिंक न केलेले या सर्वांना कोणतीही अट न घालता गहू, तांदळाचे वितरण करण्याची मागणी केली. रेशन दुकाने सकाळी 7 वाजता सुरु करण्याबाबत दुकानदारांना सूचना करण्यास सांगितले. धान्य गोदामात आत व बाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसवून ते जिल्हाधिकाऱयांच्या व्हिडीओ कॉन्फरन्सला जोडण्याची मागणी केली. यावेळी या सर्व मागण्यांचा गांभिर्याने विचार करून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेऊ असे जिल्हा पुरवठा अधिकारी कावितके यांनी स्पष्ट केले.