महागाई आणि कोरोनाच्या काळात उसनवारी करून जगण्याची वेळ
प्रतिनिधी / कोल्हापूर
कोल्हापूर महापालिकेकडे ठोक मानधनावर काम करत असलेल्या कर्मचार्यांना एप्रिल महिना उजडण्यास आला तरी अद्याप फेब्रुवारी महिन्याचा पगार मिळालेला नाही. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासनाकडून पगार करण्यात आला नसल्याने ठोकमानधनावरील कर्मचारी अडचणीत आले आहेत. महागाई आणि कोरोनाच्या संकट काळात उसनवारी करून जगण्याची वेळ या कर्मचर्यांवर आली आहे.
महापालिकेच्या शहर पाणी पुरवठा विभागासह काही महत्वाच्या विभागात ठोक मानधन तत्वावर सुमारे अडीचशेहून अधिक कर्मचारी कार्यरत आहे. त्यातील अनेकांची दहा-पंधरा वर्षे सेवा झाल्यानंतरही त्यांना कायम करण्यात आलेले नाही. त्याचबरोबर किमान वेतन कायदा अथवा समान वेतन कायद्यानुसार महिन्याचा पगार अर्थात मानधन दिले जात नाही. या कर्मचार्यांपैकी काही जण निवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. तरीही त्यांना आजवर कायम करण्यात आलेले नाही, अशी माहिती एका ठोक मानधन तत्वावर काम करणार्या कर्मचार्याने दिली.
10 हजार रूपये पगार, हातात येतात 8700 रूपये
ठोक मानधन तत्वावर काम करणार्या कर्मचार्यांना महिन्याला दहा हजार रूपये पगार आहे. त्यात कपात होऊन प्रत्यक्षात 8 हजार 700 रूपये हातात येतात. आजच्या महागाईच्या काळत एवढ्या पगारात संसार चालविणे या कर्मचार्यांना कठिण बनले आहे. अशा स्थितीत आता वेळेवर पगार होत नसल्याने अडचणीत भर पडली आहे. किमान वेतन, समान वेतन नाही, कोणत्याही सवलती नाहीत आणि आता त्यात भर म्हणून की काय फेब्रुवारीचा पगारही खात्यावर जमा झाला नसल्याने कर्मचारी सैरभैर झाले आहेत.
महापालिका कर्मचारी संघाचे दुर्लक्ष
महापालिका कर्मचारी संघाच्या वतीने केवळ कायम कर्मचार्यांचे गार्हाणे मांडले जाते. त्यांच्या हितासाठी लढले जाते. मात्र ठोक मानधनावरील कर्मचारीही महापालिकेच्या सेवेत आहेत. कायम कर्मचार्यांच्या बरोबरीने काम करत आहेत. कर्मचारी संघाशीही निगडीत आहेत. तरीही कर्मचारी संघाचे पदाधिकारी ठोक मानधनावरील कर्मचार्यांसाठी महापालिका प्रशासनाबरोबर संघर्ष करताना दिसत नाहीत, अशी नाराजी एका कर्मचार्याने व्यक्त केली.
कायम कर्मचार्यांचे पगार वेळेत अन्.. कायम कर्मचार्यांचे आणि अधिकार्यांचे पगार दर महिन्याला सात आठ तारखेला न चुकता बँक खात्यात जमा होतात. मात्र ठोक मानधनावरील कर्मचार्यांवर का अन्याय? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
ठोकमानधनावरील कर्मचार्यांच्या फेब्रुवारीच्या थकलेल्या पगारासंदर्भात माहिती घेतली जाईल. ज्यांच्यामुळे उशिरा झाला त्यांच्यावर कारवाई केली जाईल. यापुढे वेळेत पगार होतील, यासाठी व्यवस्था करून जबाबदार्याही निश्चित करण्यात येतील.
– रविकांत आडसूळ, उपायुक्त, कोमनपा