स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाची साखर आयुक्तांकडे मागणी
वार्ताहर/पंढरपूर
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या शिष्टमंडळाने सोलापूर जिह्यातील विठ्ठल सहकारी, भीमा सहकारी, सहकार शिरोमणी, संत दामाजी यांच्यासह इतर कारखान्यांच्या एफआरपी, कामगारांच्या पगारी, ऊस वाहतूक बिले यांच्यासह शेतकऱयांच्या विविध मागण्या घेऊन साखर आयुक्त (पुणे) शेखर गायकवाड यांची भेट घेतली.
ज्या साखर कारखान्यांनी शेतकऱयांची ऊस बिले (एफआरपी) संपूर्णपणे दिली आहेत अशाच साखर कारखान्यांना गाळप परवाना द्यावा, काही कारखाने करार करून चार टप्प्यात एफआरपी देणार असल्याचे सांगत आहेत व काही कारखानदार एफआरपी दिल्याची खोटी माहिती देत आहेत, अशा सर्व कारखान्यांची सखोल चौकशी करून जोपर्यंत त्यांची 100 टक्के एफआरपी पूर्ण होत नाही तोपर्यंत त्यांना गाळप परवाना देऊ नये. जिह्यातील काही साखर कारखान्यांनी सर्वसाधारण सभेमधून काही सभासदांचे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे त्या सभासदांचे सभासदत्व कायम राहावे, काही कारखानदार काटा मारून रिकव्हरी कमी दाखवणे असे प्रकार करत आहेत, त्यांच्यामध्ये लक्ष घालावे.
कारखान्याच्या सर्वसाधारण सभा ऑनलाईनच्या ऐवजी पूर्वीप्रमाणे ऑफलाईन घ्यावेत, या मागण्या घेऊन स्वाभिमानीचे सोलापूर जिह्यातील शिष्टमंडळ यामध्ये युवा जिल्हाध्यक्ष विजय रणदिवे, पंढरपूर तालुकाध्यक्ष सचिन पाटील, जिल्हा संघटक शहाजन शेख, माळशिरस तालुकाध्यक्ष अजित बोरकर, तालुका युवा अध्यक्ष अमर इंगळे, करमाळा तालुका उपाध्यक्ष तानाजी शिंदे, अतुल पिसे उपस्थित होते.
यावेळी साखर आयुक्तांनी सर्व मागण्यांचा सकारात्मक विचार करून जे कारखाने 15 ऑक्टोबरच्या अगोदर 100 टक्के एफआरपी देतील त्यांनाच गाळप परवाना देऊ. तसेच इतर विषयांसाठी लवकरच पंढरपूर येथे साखर आयुक्त व स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि साखर कारखानदार यांची बैठक घेण्याचे आश्वासन साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दिले आहे.