खासदार धैर्यशील माने यांचे प्रतिपादन : शुभम शेळकेंच्या रुपाने कणखर नेतृत्त्व मिळाल्याची भावना : सीमावासीय भगव्या ध्वजाखाली एकवटला
प्रतिनिधी / बेळगाव
हातकणंगल्याचे खासदार धैर्यशील माने यांनी धारदार शैलीतील भाषणाने सीमावासियांमध्ये नवचैतन्य निर्माण केले. एमएच 9, सिंहाचा क्रमांक 9, शुभम आपला भाऊ!, अशा शैलीत जिथे सीमाभाग संपतो तिथे वाहनांचा क्रमांक एमएच 9 होतो. योगायोगाने शुभमच्या सिंहाचा मतपत्रिकेवरील क्रमांक 9 आहे. माझ्याप्रमाणेच तरुण असलेला शुभम आपला भाऊ आहे, असे ते म्हणाले. भारताच्या इतिहासातील सर्वात तरुण खासदार होण्याची संधीही त्याला मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ही लढाई मराठी माणसाची अस्मिता आणि अस्तित्वाची आहे. येथील सरकारने भगवा ध्वज काढला, शिवरायांच्या मूर्ती हटविल्या. परंतु आमच्या मनातील महाराष्ट्राविषयीचे प्रेम कसे काढणार? बेळगावला सध्या कणखर नेतृत्वाची गरज आहे आणि हे नेतृत्व शुभम शेळकेच्या रुपाने सीमाभागाला मिळाले आहे. एका मताने काय फरक पडतो, असा विचार करत बसू नका. कारण एका मतानेही इतिहास घडतो याची जाण ठेवा.
लोकसभेत भेटल्यानंतर कर्नाटकचे खासदार म्हणतात, सीमाभागातल्या मराठी लोकांना खूप माज आहे. हो, आम्हाला आमच्या मराठी असण्याचा माज आहे. सीमावासियांच्या नादाला लागाल तर भुईसपाट व्हाल. या लढणाऱया सिंहामुळे सीमाभागात नवी क्रांती घडणार आहे. त्यामुळे या क्रांतीतील एक मशाल म्हणून कामाला लागा, असे आवाहन खासदार माने यांनी केले.
खासदार अमोल कोल्हे यांचा मोबाईलवरून संदेश
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पाठविलेला संदेश सीमावासियांना ऐकविण्यात आला. सीमावासीय भगव्या ध्वजाखाली एकवटला आहे. हीच एकी दाखवून सीमाभागाचा खासदार संसदेत पाठवा. मग बघू कसा अन्याय केला जातो, असा इशाराच त्यांनी आपल्या संदेशातून दिला.
शिवसेनेचे कोल्हापूर जिल्हाध्यक्ष विजय देवणे यांनी 65 वर्षात अत्याचारामुळे सीमावासीय भरडला जात आहे. बऱयाच वर्षांनंतर पुन्हा एकदा समितीच्या सिंहाची डरकाळी ऐकू आली आहे. यापुढे जर सीमावासियांवर अत्याचार झाला तर बांबू कुठे बसतील हे समजणारसुद्धा नाही. शिवसैनिकांना अडवाल तर परिणाम महाराष्ट्रात भोगावा लागेल, अशी तंबी त्यांनी यावेळी दिली.
मध्यवर्ती म.ए. समितीचे उमेदवार शुभम शेळके यांनी आपल्या भाषणातून विरोधकांना गारद केले. हम तो फकीर है असे म्हणत येई ते अंगावर घेऊ आणि त्याला चांगलेच प्रत्युत्तर देऊ. म. ए. समितीने आजवर कधीही जाती-पातीचे आणि धर्माचे राजकारण केलेले नाही. महाराजांची विटंबना झाली त्यावेळी येथील लोकप्रतिनिधी मूग गिळून गप्प होते. आता मात्र महाराजांच्या मूर्तींना हार घालण्यासाठी स्पर्धा सुरू झाली आहे. आज आमचा नैतिक विजय झाला असून आम्ही कोणाला पाडायला नाही तर लढायला निवडणुकीत उतरलो आहे. आमचेच भाऊबंद राष्ट्रीय पक्षात गेले आहेत. त्यांना आम्ही परत येण्याचे आवाहन करतो, असे शुभम शेळके यांनी सांगितले.
मध्यवर्ती म. ए. समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांनीही सीमावासियांवर होणाऱया अत्याचाराचा पाढा वाचला. सभेचे सूत्रसंचालन महादेव पाटील यांनी केले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी बेळगाव शहरासह तालुक्मयातून हजारोंच्या संख्येने सीमाबांधव उपस्थित होते.
यावेळी शिवसेना संपर्कप्रमुख अरविंद नागनुरी, जिल्हाप्रमुख प्रकाश शिरोळकर, मध्यवर्ती म.ए. समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर, सरचिटणीस मालोजी अष्टेकर, शिवसेना नेते संग्राम कुप्पेकर, मदन बामणे, श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर, शिवसेना संघटक दत्ता जाधव, महिला आघाडीच्या अध्यक्षा रेणू किल्लेकर, माजी महापौर सरिता पाटील, संज्योत बांदेकर उपस्थित होते.