वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
शेतकऱयांच्या मुद्दय़ावर सातत्याने स्वतःच्या पक्षाच्या सरकारवर टीका करणारे भाजप खासदार वरुण गांधी यानी आता एमएसपीच्या हमीवर कायदा लागू व्हावा याकरता खासगी विधेयक मांडण्याचा निर्णय घेतला आहे. वरुण गांधींचे हे विधेयक अद्याप संसदेत मांडले गेलेले नाही. या विधेयकाद्वारे त्यांनी 22 पिकांवर देण्यात येणाऱया एमएसपीला कायदेशीर हमी देण्याची मागणी केली आहे.
शेतकऱयाला हमीभावापेक्षा कमी दर मिळाल्यास त्याला भरपाई मिळावी अशी तरतूद या विधेयकात आहे. देवाणघेवाणीच्या दोन दिवसांच्या आत रक्कम थेट शेतकऱयांच्या खात्यात जमा व्हावी असाही त्यांचा प्रस्ताव आहे.
शेतकरी आणि सरकार दीर्घकाळापासून कृषी संकटावर चर्चा करत आहेत. आता एमएसपीवर कायदा आणण्याची वेळ आली असल्याचे वरुण यांनी नमूद केले आहे. पीलीभीतचे भाजप खासदार वरुण गांधी हे शेतकऱयांच्या प्रकरणी सातत्याने मोदी सरकारला लक्ष्य करत आले आहेत. लखीमपूर खीरी हिंसेप्रकरणी केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या विरोधात कठोर कारवाईची मागणी करणाऱयांमध्ये त्यांचा समावेश होता. केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचे पुत्र आशीष हे याप्रकरणी मुख्य आरोपी आहेत.
एमएसपीची हमी मिळाल्यास 9.3 कोटी कुटुंबांना लाभ होईल आणि ग्रामीण अर्थव्यवस्थेला गती मिळाणार असल्याचा वरुण गांधी यांचा दावा आहे. कुठलाही खासदार खासगी विधेयक मांडू शकतो. 1952 पासून अनेक खासगी विधेयके आतापर्यंत संमत झाली आहेत.