मुंबई \ ऑनलाईन टीम
कोरोनामुळे राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीच्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. तर एमपीएससीच्या परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे विद्यार्थ्यांच्यात नैराश्याचे वातावरण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी एमपीएससीच्या कारभारावर सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित केला आहे. युवा पिढी निराश असून लवकरात लवकर परीक्षा घ्याव्यात, अशी विनंती रोहित पवार यांनी राज्य सरकारला ट्वीटच्या माध्यमातून केली आहे.
रोहित पवार यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा आणि प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन ही परीक्षा त्वरीत घेण्यात यावी आणि प्रलंबित नियुक्त्याही तातडीने देण्यात याव्यात, अशी विनंती रोहित पवार यांनी सरकारला केली आहे.
पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या २४ वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने एमपीएससीची परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे आत्महत्या केली. या घटनेमुळे फक्त पुणेच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला धक्का बसला आहे. राज्यात मोठ्या संख्येने तरुण या परीक्षेची तयारी करत असतात. त्यांच्यासाठी देखील हा धक्का ठरला. या तरुणाच्या आत्महत्येवर हळहळ व्यक्त होतानाच दुसरीकडे एमपीएससीच्या कारभारावर आणि निर्णय प्रक्रियेतील ढिलाईवरही तीव्र टीका होऊ लागली आहे.