ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 2019 मध्ये घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील प्रसाद चौघुले हा राज्यात पहिला तर उस्मानाबादचा रवींद्र शेळके हा मागासवर्गवारीत प्रथम तर अमरावतीची पर्वणी पाटील महिला वर्गवारीत राज्यात प्रथम क्रमांकावर उत्तीर्ण झाली आहे.
13 ते 15 जुलै 2019 दरम्यान ही परीक्षा घेण्यात आली होती. या परीक्षेसाठी राज्यातील 6825 विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यातील 1326 विद्यार्थी मुलाखतीसाठी अर्हताप्राप्त ठरले. तर यातील 420 जणांची निवड अधिकारी म्हणून केली जाणार आहे.
एमपीएससीच्या निकालानंतर उमेदवारांना त्यांच्या उत्तरपत्रिकेतील गुणांची पडताळणी करता येणार आहे. ज्या उमेदवारांना त्यांच्या गुणांची पडताळणी करायची आहे त्यांनी गुणपत्रके प्रोफाईलमध्ये पाठवण्याच्या दिनांकापासून 10 दिवसात आयोगाकडे ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे गरजेचे आहे.