ग्रामीण भागात जनावर चोरट्यांचा सुळसुळाट, पशुपालकांमध्ये भिती
प्रतिनिधी / मिरज
मिरज तालुक्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून जनावरे जोरणाऱ्या चोरट्यांचा सुळसुळाट झाला आहे. आत्तापर्यंत एक दोन जनावरे चोरीस जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना शुक्रवारी चोरट्यांनी भलतेच धाडस दाखविले. तालुक्यातील एरंडोली येथे शेतातून एकाचवेळी 31 मेंढ्यांची चोरी झाली आहे. याप्रकरणी दशरथ भरमु माने वय 25, रा. लिंगनुर रोड, एरंडोली या मेंढ पाळ्याने मिरज ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. शेतातून मेंढ्यांचा कळपच चोरीस गेल्याने पशुपालकांमध्ये घबराट पसरली आहे.
मेंढपाळ दशरथ माने, बिरू हक्के आणि काशिनाथ हक्के यांनी एरंडोली येथे शिवाजी राजाराम काटकर यांच्या शेतात गुरुवारी सकाळी लेंढी खतासाठी आपल्या मेंढ्या बसविल्या होत्या. रात्री १२ वाजण्याच्या सुमारास सदर मेंढ्यांच्या कळपातून एकाच वेळी ३१ मेंढ्यांच्या कळप चोरीला गेल्याने घबराट पसरली आहे.