दापोली/ प्रतिनिधी
अरबी समुद्रामध्ये बेकायदेशीररित्या होणाऱया एलईडी फिशिंग, फास्टर व पर्ससीन नौकांद्वारे होणाऱया मासेमारीच्या विरोधात अनेक निवेदने देऊनही कार्यवाही नसल्याने कंटाळलेल्या कोळी बांधवांनी सोमवारपासून तहसील कार्यालयासमोर बेमुदत साखळी उपोषणाचा मार्ग अवलंबला आहे.
महाराष्ट्र राज्यातील सागरी हद्दीमध्ये परप्रांतीय हायस्पीड बोटी व एलईडी लाईटद्वारे केली जाणारी अनियंत्रित बेकायदेशीर पर्ससीन नेट मासेमारीमुळे सागरी मत्स्योत्पादनात कमालीची घट झाली आहे. परिणामी गेली 2-3 वर्षे कोकण किनारपट्टीवर मत्स्यदुष्काळ निर्माण झाला आहे. ही बेकायदेशीर मासेमारी रोखण्याबाबत शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्यामुळे हायस्पीड बोटी व एलईडी बोर्टीची संख्या वाढत आहे. त्याची झळ पारंपरिक मच्छीमारांना बसत आहे. सध्या कोकण किनारपट्टीवर 80-90 टक्के नौका बंदरे व खाडय़ांमध्ये नांगरुन ठेवण्याची वेळ आली आहे. त्यामुळे पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे.
मच्छीमार संघटना व मच्छीमारी सहकारी संस्थांकडून लोकप्रतिनिधीमार्फत अनेकदा निवेदने व आंदोलनाद्वारे बेकायदेशीर मासेमारीकडे शासनाचे लक्ष वेधण्यात आले. मात्र शासनाने प्रत्यक्षात बेकायदेशीर मासेमारीकडे डोळेझाक करून त्याला अभय दिल्याचा मच्छीमारांचा आरोप आहे. त्यामुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीवरील पारंपरिक मच्छीमार समाजाचा उदरनिर्वाहाचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. ही बेकायदेशीर मासेमारी तत्काळ थांबवावी व संबंधितांवर कठोर कारवाई व्हावी, या मागणीसाठी दापोली – मंडणगड- गुहागर मच्छीमार संघर्ष समितीच्यावतीने बेमुदत साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
…