नागरिकांमधून विचारला जात आहे प्रश्न
प्रतिनिधी/ बेळगाव
विजेची बचत होण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने माफक दरात एलईडी बल्बचे वितरण सुरू करण्यात आले होते. परंतु लॉकडाऊनपासून एलईडी बल्बचे वितरण अद्याप बंद आहे. त्यामुळे नागरिकांना अधिक पैसे खर्च करून दुकानांमधून बल्ब आणावे लागत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल झाले असातानाही बल्बची विक्री बंद का? असा प्रश्न नागरिक उपस्थित करीत आहेत.
केंद्र सरकारच्या ‘उजाला’ व राज्य सरकारच्या ‘व्हसा बेळकू’ योजनेतून 9 वॅट क्षमतेचा एलईडी बल्ब विक्री करण्यात येत होता. 70 रुपयांना हा बल्ब ग्राहकांना मिळत होता. रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालय व रेल्वेस्टेशन येथील हेस्कॉम कार्यालयात बल्बची विक्री करण्यात येत होती. बल्बसोबतच टय़ूबलाईट व सिलिंग फॅनची विक्री वितरकांकडून करण्यात येत होती.
परंतु लॉकडाऊन काळात ही विक्री बंद ठेवण्यात आली आहे. दुकानात विक्री होणाऱया बल्बपेक्षा याची किंमत तुलनेने कमी असल्यामुळे विक्री मोठय़ा प्रमाणात होत होती. बेळगाव विभागात बल्बची विक्री करण्यासाठी कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली आहे. परंतु वाहतुकीअभावी बल्ब उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे बल्बची विक्री बंद का? असा प्रश्न ग्राहक विचारत आहेत.