वृत्तसंस्था / मुंबई
जगातील दहाव्या क्रमांकाची इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील कंपनी एलजी आता स्मार्टफोनच्या निर्मितीमधून बाहेर पडणार असल्याचे समजते. स्मार्टफोन व्यतिरिक्त इतर उत्पादनांच्या निर्मितीवर लक्ष केंद्रित करण्याचे नियोजन कंपनीने केले असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येते.
याचाच अर्थ एलजी आता यापुढे स्मार्टफोनची निर्मिती करणार नाही. भारतीय स्मार्टफोनच्या बाजारांमध्ये एलजीची हिस्सेदारी 0.05 पेक्षाही कमीच आहे. या कंपनीची बाजारातील सर्वाधिक 7 टक्के इतकी हिस्सेदारी 2011 मध्ये नोंदली गेली होती. 2018 मध्ये संशोधन फर्म कौंटरपॉईंटनुसार जागतिक बाजारांमध्ये 3 टक्के इतका वाटा प्राप्त केला होता. त्यावेळी कंपनी सातव्या क्रमांकावर होती. त्यानंतर मात्र टॉप सात कंपन्यांच्या यादीतून कंपनी बाहेर पडली. कंपनीतील 60 टक्के कर्मचाऱयांनी अन्यत्र जाणे पसंत केले. संबंधित कर्मचाऱयांच्याबाबतीत योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.
5 वर्षात 32 हजार कोटी पाण्यात
मिळालेल्या माहितीनुसार गेल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कंपनीला 32 हजार 856 कोटी रुपयांचे नुकसान झाले असल्याचे समजते. म्हणूनच स्मार्टफोन निर्मिती बंद करण्याचा निर्णय घेतला गेल्याचे सांगण्यात येत आहे.