पुणे / वार्ताहर :
एल्गार परिषद आणि बंदी घातलेल्या माओवादी संघटनांशी संबंध असल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मुंबईतील एनआयए न्यायालयात दाखल केलेल्या एफआयआरमध्ये आरोपींवर देशद्रोहाचे कलम लावण्यात आलेले नाही.
या एफआयआरमध्ये एकूण 11 जणांची नावे असून, त्यापैकी नऊ जण सध्या तुरुंगात आहेत. या सर्वजणांवर बेकायदेशीर हालचाली प्रतिबंधक कायदा (यूएपीए) आणि भादंविच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मात्र, एनआयएच्या नव्या एफआयआरमध्ये संशयितांविरोधात देशद्रोहाचे कलमच लावण्यात आलेले नाही. पूर्वी येथे दाखल असलेल्या एफआयआरमध्ये भादंवि कलमाच्या 124 ए (देशद्रोह) नुसार गुन्हा दाखल आहे. यामध्ये नऊ जणांच्या विरोधात तपास करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे
या प्रकरणातील काही आरोपींना नजरकैदेत ठेवण्यात आल्यानंतर सर्व आरोपींवर देशद्रोहाच्या कलमाची वाढ करण्यात आली होती. पुणे पोलिसांनी त्या अनुषंगाने तपास देखील केला आहे. मात्र एनआयएच्या एफआयआरमध्ये देशद्रोहाचे कलम दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.