फेसबुकवर केली भावनिक पोस्ट : तीन वर्षापूर्वी आईचे निधन : आजाराचे निदान न झाल्याचे शल्य
प्रतिनिधी/इस्लामपूर
जीवाची बाजी लावून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर जगातील सर्वोच्च एव्हरेस्ट शिखर सर केलेले पडवळवाडी (ता. वाळवा) येथील सहायक पोलीस निरीक्षक संभाजी गुरव यांनी हे यश आईला अर्पण केले आहे. सोमवारी त्यांनी आपल्या फेसबुकवरुन ही भावनिक पोस्ट केली.
गुरव हे मुंबई पोलीस दलात कार्यरत आहेत. पहिल्याच प्रयत्नात एव्हरेस्ट सर करणारे ते पहिले मराठी पोलीस अधिकारी आहेत. सांगली, कोल्हापूर जिल्हÎातील पहिले एव्हरेस्टवीर ते ठरणार आहेत. सांगली जिल्हÎाचे तत्कालीन जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा व औरंगाबाद येथील कर्मचारी रफिक शेख यांनी एव्हरेस्ट सर केला होता. गुरव हे प्रचंड धाडसी, जिद्दीचे आहेत. गडचिरोली येथे कार्यरत असताना त्यांनी चार एन्काऊंटर केल्याबद्दल त्यांना राष्ट्रपती शौर्य पथकाने सन्मानित करण्यात आले होते.
संभाजी गुरव हे पडवळवाडी गावातील सामान्य कुटुंबातील आहेत. सुरुवातीपासून त्यांना गिर्यारोहणाची आवड आहे. तीन वर्षापासून त्यांनी एव्हरेस्ट सर करण्याचा निश्चिय केला होता. अखेर त्यांना हे शिखर पादाक्रांत करण्यात यश आले. सोमवारी त्यांनी फेसबुकवर पोस्ट व्हायरल करताना `माझ्या तीर्थरुप आईस’ हे यश अर्पण करीत असल्याचे म्हटले आहे.
आईच्या आठवणीने भावून झालोय….
रविवार 23 मे रोजी सकाळी साडेसहा वाजता एव्हरेस्टवर पोहोचलो. हा दिवस सर्वोच्च स्वप्नपूर्तीचा आहे. तीन वर्षापूर्वी पाहिलेले स्वप्न पूर्ण झाले. खरं तर हे स्वप्न माझ्यासाठी वेदनादायक होतं. माझ्या आईचे तीन वर्षापूर्वी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यावेळी मला माझ्या आईचं आजारपण ओळखता आलं नाही, त्याचे शल्य माझ्या मनात आयुष्यभर राहिल. आईच्या निधनानंतर मी कोणताही विधी केला नाही. फक्त मनोमन संकल्प केला की, मी असं स्वप्न पाहिन की, जे पूर्ण करताना माझ्या शरीराला वेदना होतील. जेणे करुन मला माझ्या आईच्या त्यागाची, तिच्या समर्पणाची, मातृत्वाची पदोपदी आठवण राहिल. जगातील सर्वोच्च शिखर जरी सर केलं तरी सर्व आई विना शून्य आहे. थोडासा भावनिक झालो. पण माझ्या मोहिमेचा उद्देश सांगणे गरजेचं वाटलं, असं ही त्यांनी शेवटी म्हटलं आहे.