बेंगळूर/प्रतिनिधी
राज्याचे शिक्षणमंत्री एस. सुरेश. कुमार यांनी शुक्रवारी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांशी संवाद साधून झाल्यांनतर शिक्षणमंत्री एस. सुरेश कुमार यांनी “ही परीक्षा मुख्यतः विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी असते आणि ही परीक्षा आयोजित करण्याची जबाबदारी सरकारची आहे.” तसेच एसएसएलसी परीक्षा घेणे आवश्यक असून ती कोणत्याही परिस्थितीत रद्द करता येणार नाही, असे ते म्हणाले.
“पीयूसी 2 विद्यार्थ्यांसाठी एसएसएलसी आणि पीयूसी 1 परीक्षांचे गुण विचारात घेऊन त्यांचा निकाल दिला जाणार आहे. तसेच द्वितीय पीयूसी परीक्षा घेण्यास लागणारा कालावधी १९ दिवसांपेक्षा जास्त होता. या सर्वांचा विचार करता आम्ही त्यांच्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला,” असे त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, मंत्री एस. सुरेश कुमार यांनी विद्यार्थ्यांना प्रश्न थेट व सुलभ असल्याचे स्पष्ट केले. “विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका किंवा परीक्षा केंद्राबद्दल चिंता करण्याची गरज नाही. प्रश्न थेट व सोपे असतील आणि केंद्रांची स्वच्छता होईल. विद्यार्थी कोणत्याही भीतीशिवाय परीक्षांना उपस्थित राहू शकतात,” असे ते पुढे म्हणाले.