नवी दिल्ली / वृत्तसंस्था
मुख्य राष्ट्रीय प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनी भारतीय बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉयची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस केली. यापूर्वी भारतीय बॅडमिंटन संघटनेने शिस्तपालनातील त्रुटीमुळे सलग दोन वर्षे प्रणॉयकडे दुर्लक्ष केले होते. यंदा अर्जुन पुरस्कारासाठी भारतीय बॅडमिंटन संघटनेने 2 जून रोजी सात्विकराज रणकिरणरेड्डी, चिराग शेट्टी व समीर वर्मा यांची शिफारस केली व त्यानंतर नाराज एचएस प्रणॉयने ट्वीटरवर आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
‘जुनीच कहाणी. राष्ट्रकुल व आशियाई चॅम्पियनशिपमध्ये पदके जिंकली असली तरी साधी शिफारसही संघटनेने केलेली नाही आणि जे अशा अव्वल स्पर्धांच्या आसपासही नाहीत, त्यांची मात्र शिफारस केली गेली आहे. यापेक्षा दुसरा विनोद असू शकत नाही’, असे प्रणॉयने त्यावेळी ट्वीट केले. अर्थात, नंतर ते ट्वीट त्याने डिलिटही केले आहे.
‘एचएस प्रणॉयची वर्तणूक शिस्तीत बसणारी नाही. अनेकदा समज देण्याची, कारवाई करण्याची वेळ त्याने संघटनेवर आणली आहे आणि गोपीचंद यांना याची कल्पना नसल्यामुळेच त्यांनी त्याची शिफारस केली असावी’, असे भारतीय बॅडमिंटन संघटनेचे सचिव अजय सिंघानिया यांनी स्पष्ट केले. प्रणॉय व त्याचा संघसहकारी किदाम्बी श्रीकांत यांनी मनिलात आशियाई सांघिक चॅम्पियनशिपच्या उपांत्य फेरीत खेळण्यास नकार दिला, हे भारतीय बॅडमिंटन संघटनेच्या नाराजीचे मुख्य कारण मानले जाते.